Saturday, 22 August 2020

माणूसकी - कथा माणसाच्या माणूसपणाची.

गौरी गणपतीचे दिवस होते. संध्याकाळचे सात वाजले होते. संध्याकाळी रोज वाॅकला जायचं हे नियमित रमेशचं ठरलेलं. आजही तो पाच- सहा किलोमीटर चालत रनिंग करत ठरल्याप्रमाणे नारायण चौकात आल्यावर कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी, फळं, आणि फुलांचे हार, हाराळी, जास्वंद फूल, फुलांची कंठी फूलवाल्याकडून घेऊन, किराणा दुकानातून नारळ,ब्रेड असं सगळं निताने सांगितलेलं सामान घेऊन तो निघाला. तीनचार पिशव्या जड झाल्या कारणाने त्याने तेथूनच रिक्षा पकडली. तो फोनवर बोलत बोलतच दहा मिनिटात सोसायटीच्या गेटमधे रिक्षातून उतरला. पैसे पाकिट मधून काढायचे म्हणून मोबाईल बसल्या जागी बाजूला रिक्षातच ठेवला. रिक्षावाल्याला पैसे दिले. सामानाच्या सगळ्या पिशव्या उचलल्या मात्र या गडबडीत मोबाईल घ्यायचं रमेशच विसरला.


रमेश घरी आला. हातपाय धुऊन गौरी-गणपतीची आरती केली. तोपर्यंत निताने जेवणाचं ताट बनवलं पुरणपोळी-तूप, दूध, कटाची आमटी असं सारं जेवण ताटात वाढलं. अन् रमेशला तितक्यात मोबाईलची आठवण झाली. झालं रमेशनं नितानं घर डोक्यावर घेतलं. पहिलं घरात, कपाटात, सोफ्यामागे शोधून झालं. नंतर सोसायटीच्या गेटमधे शोधलं. पण मोबाईल काही सापडेना. मोबाईलची रिंग वाजायची पण मोबाईल कोणी उचलत नव्हतं याचा अर्थ काय? व्हाटसअप मेसेज जात-येत होते. पण रिप्लाय नाही. कुठे विसरलो मोबाईल रमेशला काही आठवत नव्हतं. भाजीवाल्याकडे, फळाच्या दुकानात की किराणा दुकानात काहीच कळेना. सत्तर हजाराचा आयफोन. पण रमेशला पक्का विश्वास होता. फोन रिक्षातच विसरलो आपण. फोन लावून लावून मेसेज करून  रमेश आणि निता थकले. रिंग जात होती काय ते एवढंच...पण फोन कोणी उचलत नव्हते. निताने पाच- पन्नास मेसेजही केले पण रिप्लाय नाही. फोन चालू असल्याचे मात्र कळत होते.

रमेशने तर मोबाईल मिळण्याची आशाच सोडली. नविन मोबाईल घेण्याची स्वप्नें तो पाहू लागला. निता म्हणाली, ‘ हा , तरी मी किती दिवस झाले म्हणत होते, मला नविन मोबाईल घेऊन दया तर तोंडावरची माशी हलत नव्हती. आज मात्र स्वतःचा हरवला की लगेच निघाले मोबाईल घ्यायला. कसेतरी जेवण उरकून, दोन घास पोटात ढकलून सगळे झोपायला गेले. रमेश निताला म्हणाला,” मोबाईलचं जाऊ दे गं. पण आपले फॅमिली फोटो गेले, डाटा, मेल, फोननंबर सर्व काही होतं त्यात. बॅकअप नव्हते केले.” निता अधूनमधून मोबाईल वर पत्ता पाठव, प्लीज काॅल ऑन दिस नंबर असे मेसेज करतच होती. फ़ोन करत होती. शेवटी पहाटे तीनचारला, पाचला फ़ोन लावला फ़ोन बंद आला. आता तर संपूर्ण आशाच सोडून दिली दोंघानी.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी आशाच मावळलेली निता नियमितपणे आपली कामं  करू लागली. रमेश अजून झोपेतच होता. रात्री जागरण झालेलं. नितानं दूध तापवून चहाचं आधण गॅसवर ठेवलं. तितक्यात अचानक निताच्या मोबाईलची रिंग वाजली. रमेश काॅलिंग अन् निताच्या आनंदाला पारावर उरला नाही. क्षणात सगळं टेन्शन गेलं. तिने पळत जाऊन रमेशला आपला फोन दिला.  समोरची व्यक्ती बोलत होती,” साहाब कल आप ॲटो मे मोबाईल भूल गये थे मैं आता हूँ देंने. पता मुझे मालूम हैं. आपको कल छोडा था...वही सोसायटी. आपके पासहीं रहता हूँ मै.” रमेशने ही आपला पत्ता सांगितला. निताने बाप्पाला हात जोडले आणि चहा नाष्टा बनवला. तो माणूस  येई तोपर्यंत दोंघाच्या ही जिवात जीव नव्हता. अर्ध्या तासात तो माणूस दारात हजर झाला. दारावरची बेल वाजली. ते रिक्षा चालवणारे सदगृहस्थ आत आले. चाळीस पंचेचाळीस वर्षाचे असतील. निताने पाणी दिलं. चहा दिला. त्या गृहस्थानी मोबाईल रमेशच्या हातात दिला. अगदी सुखरूप काहीही झाले नव्हते मोबाईलला.

तो म्हणाला, " माफ करा कालच आणून देणार होतो. पण घरी जाताना दारू प्यायलो. काल सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन नाक्यानाक्यावर पोलीसाचा पेहरा मग काय दारू पिऊन पकडलं असतं तर म्हणून गुपचूप घरी जाऊन पडलो. तुमचा फोनपण भारी. लाॅक. ऑपरेट कसा करायचा हेही या अडाण्याला ठावूक नाही. मग काय करायचं समजेनाच. सकाळी मुलगा कामावरून आला. मोबाईल चार्ज केला. तोच तुम्हाला त्यानं त्याच्या फोनवरून नंबर लावला. डिस्पलेवरचा मेसेज वाचून." रमेशने निताने त्यांचे आभार मानले. भरपेट लाडू चिवडा नाष्टा खाऊ घातला. रमेशने चांदीची गणपती आणि दोन हजार रुपये काकांच्या हातात ठेवले. तर रिक्षावाले काका नको म्हणाले. साहेब माझा मुलगा खूप शिकलाय त्याला तुमच्या कंपनीत कामाला लावा. रमेश म्हणाला," मी नक्की प्रयत्न करतो. त्याला फोन करायला सांगा मला. काका आनंदाने घरी परतले. रमेश आणि निताने समोरच्या बाप्पाला परत एकदा हात जोडले. अजूनही चांगली माणसं या जगात आहेत यावर रमेश व निताचा विश्वास बसला. काही गोड काही कटू प्रसंग  प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. मात्र काही प्रसंग संयमाने हाताळावे लागतात याचं उत्तम उदाहरण हा प्रसंग रमेशला आणि निताला शिकवून गेला कारण हा मोबाईल विकून सहज वीस-पंचवीस हजार रुपये त्या काकांना मिळाले असते पण त्यांनी तसे केले नाही कारण अजून माणूसकी शिल्लक होती त्याच्या आत.


कथा - तनुजा ढेरे