Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts

Friday, 8 April 2022

भेटीगाठी- श्याम पेंढारी

 भेटीगाठी  - ललित लेखसंग्रह - श्याम पेंढारी



कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी यांचे 'भेटीगाठी' हे पुस्तक अलीकडेच वाचनात आले. जे.के. मिडिया प्रकाशन संस्थेच्या ज्योती कपिले यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक. चित्रकार सतीश भावसार यांचं उत्कृष्ट मुखपृष्ठ. खरंतर  या पुस्तकाची अर्पणपत्रिका व प्रास्ताविक वाचले आणि मनात कुतूहल निर्माण झाले. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य असे की लेखकाने चक्क मनीमाऊशी संवाद साधला आहे. आपल्याला भेटलेली माणसे, आलेले अनुभव व मनातल्या गोष्टी लेखकाने अतिशय सहृदयभावनेने हळुवारपणे या आपल्या आवडत्या मनीमाऊजवळ व्यक्त केल्या आहेत. लेखकाचे गावच्या कौलारू घरावर, घरात पाळलेल्या  मांजरींवर व कुत्र्यावर असलेले प्रेम व याचबरोबर लेखक- कवी म्हणून अनुभवलेल्या विविध साहित्यिक घडामोडी, तसेच भेटलेले कवी-लेखक त्यांच्या आवडलेल्या गोष्टी यांना खुल्या मनाने लेखकाने दिलेली दाद भावते. तसेच मनातील खंतही अतीशय संयत शब्दात लेखकाने मांडले आहे. एकशे बारा पानाच्या या छोटेखानी पुस्तकात तीस लेख आहेत व हे लेख नुसते माहितीवजा नाहीत तर या लेखांमधे लेखकाने अतीशय सूक्ष्मपणे प्रत्यक्षात भेटलेल्या व मनात वसलेल्या ठिकाणांचे सूक्ष्मपणे भावचित्रण केले आहे. जसे की 'गिरगाव', 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. तसेच लेखकाने वाचलेलं व भावलेलं एखादं मासिक, वर्तमानपत्राच्या रविवारच्या विविध पुरवण्या, कविसंमेलन व कविसंमेलनात भेटलेले कवी व आयुष्यात भेटलेले मित्र व त्यांचे अनुभव या मनीमाऊशी लेखकाने अतीशय सहज आपण एखाद्या मैत्रणिंशी गप्पा माराव्या अगदी तसाच संवाद लेखकाने साधला आहे. आणखिन एक गोष्ट केवळ आठवणी वजा लेखन न करता लेखकाने महागाई, बेरोजगारी, राजकारण, समाजकारण याविषयावरही या पुस्तकातून संवाद साधला आहे. यावरून एक लेखक म्हणून लेखकाची वर्तमानाविषयी जागरूकता व भविष्याविषयी असलेली मनातील काळजी दिसून येते. त्याचबरोबर आठवणींची सुंगधी कुपी आपल्या मनीमाऊ समोर उघडली आहे. प्रसन्न,ओजस्वी व ओघवती भाषा, प्रसंगी कवितेच्या व गीतांच्या ओळी  यामुळे हे लेख वाचनीय झाले आहेत. प्राजक्त, मातीचे घर, मैत्रीचा गाव हे कवितासंग्रह, वळणावरती कादंबरी व कंदील हा लेखसंग्रह ही अन्य पुस्तके देखिल लेखकाची वाचनीय आहेत.


@ तनुजा ढेरे


#भेटीगाठी

#श्याम पेंढारी

आलोक - कथासंग्रह परिचय


 आलोक - आसाराम लोमटे कथासंग्रह 


आ लो क - आसाराम लोमटे

आलोक आसाराम लोमटे

लेखक-पत्रकार-परभणी) यांचा हा कथासंग्रह, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त (२०१६), मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात  समावेश असलेला हा कथासंग्रह विद्यार्थांना वास्तववादी दृष्टीकोनातून जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर देतोच परंतु त्याचबरोबर साहित्यिक अंगाने  कथानका मार्फत कथा लेखनाकडे पाहताना कसं पहावं हेही हा कथासंग्रहाद्वारे शेवटी लेखक सांगतो. मुंबईच्या शब्द पब्लिकेशन  जानेवारी २०१० मधे हा कथासंग्रह प्रकाशित केला. 'इडा पिडा टळो' हा कथासंग्रह व 'धूळपेर' लेखसंग्रह अशी आणखी दोन पुस्तकं लेखकाची प्रकाशित आहेत. 'चिरेबंद', 'ओझं', 'खुंदळन', 'कुंभाड', 'जीत' व 'वळण' अशा एकूण सहा दीर्घ कथा या कथासंग्रहात आहेत.


कथासंग्रहाच्या सुरवातीला अर्पणपत्रिकेत लेखक म्हणतो, 'अशांना, ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत.' त्यांना समर्पित.  इथेच लेखकाच्या प्रतिभेची चुणूक दिसून येते. अचूक प्रतिमा, प्रतीके व निवेदनशैलीचा वापर करून आपल्या कथाविश्वाला पोषक पायाभरणी करूनच कथाकार आसाराम लोमटे आपल्या कथेतील मूळ गाभ्याला हात घालतात.


'चिरेबंद' या कथेची सुरवातच पाह्यली तर जाणवते, 'दोन-चार दिवसांपासून चालू असलेली पावसाची झड. आभळातून कणी-कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर सुरूच.' अगदी अचूक निसर्ग प्रतिमा वापरून कथानकाला लेखक हात घालतो या कथेतून लेखकाने ओघवत्या शैलीत आत्मनिवेदन पध्दतीने, प्रसाद या वीस- बावीस वर्षाच्या तरुण नायक पात्राच्या सहाय्याने कथा उभारली आहे. त्याची आजी, आजोबा व चिरेबंदी वाडा यांच्याशी जोडलेली त्याची नाळ व ओळख, नव्या व जुन्या नातेसंबंधातील वीण, पावसाच्या संततधार लयी सारख्या उलगडत त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानाचे जीवंत चित्र या कथेतून उभे केले आहे.


तशीच  'ओझं' ही कथा, या कथेचं पहिलं वाक्य, डरपोक माणसासारखा पाऊस पळून गेलेला. एखाद्या भित्र्यागत दडी मारून लपून बसलेला त्याच्यात धाडसच नाही धाड धाड आवाज करीत यायचं. एखाद्या धिप्पाड माणसानंही बुळ्यासारखं असावं तसं आभाळाचं येणंही वांझ वाटायलेलं.' दोन भावांची ही कथा एक प्राध्यापक व एक शेतकरी दोघांच्या मनामधील अंतर मांडणारी. कथेची सुरवात, मध्य व शेवट कथेचा घाट बांधून, पात्र, प्रसंग व वातावरण निर्मिती करून पात्रापात्रातील संबध त्यातून वातावरणनिर्मिती करत तसेच त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवर/ सामुहिक पातळीवर त्या पात्राच्या मनोभूमिकेत शिरून त्यांच्या मनातील अंतर्गत संघर्षांतून प्रसंगानुरूप निवेदन करत कथांची उभारणी केली आहे. 


'खुंदळन' ही कथा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारीत असून, ठसठशीत अशा भाषेचा प्रयोग लेखकाने या कथेत केला आहे. उदा : ' आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसाहेब पोरकेपण भवती दाटून आलं.' ही कथा 'दत्ताराव' या व्यक्तीरेखेभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील गटबाजीय राजकारण, त्या राजकारणात सहभागी व्यक्ती, त्याचा कुटूंबातील सर्व सदस्यावर त्याचा होणारा परिणाम अधोरेखीत केला आहे. 'जीत' ही कथाही ग्रामीण परिसरातील राजकीय जीवनावर भाष्य करते,  ग्रामीण जगण्यातले बारीकसारीक संघर्ष अनुभवाच्या पातळीवर साकारले आहेत. प्रथमपुरूषी व तृतीयपुरूषी निवेदनातून पुढे आलेल्या या कथा घटना, प्रसंग व प्रतिमांच्या सुयोग्य वापराने व बोलीभाषेच्या वापरामुळे अजूनच उठावदार झाल्या आहेत.  


'कुभांड' या कथेतून गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन होते. तशीच 'वळण’ ही कथा, मनाचा तळठाव गाठणारी  ! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या शेती राख्याची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना वाटेवर कोणाच्यातरी चिरकण्याचा आवाज ऐकू येते, ती मागे वळून पहाते तर डगरीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. नंतर पोलीस तिची चौकशी करतात. प्रयागच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं. या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावर पोट असणाऱ्यांचा आयुष्यातील एक कोडं सुटताच दुसऱ्या कोड्यात अडकावं ही अवस्था वाचकाला अस्वस्थ करते.


लेखक आसाराम लोमटे आपली लेखनासाठी भूमिका मांडताना म्हणतात, "सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील पण सगळ्यांच्या वाटेला आलेला काय सारखाच नसतो." आपल्याला तो वेगळा काळ, ती गोष्ट, तो क्षण पकडता आला पाहिजे. ग्रामीण परिसरातील माणसाच्या जगण्यावर  प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण कथा म्हणजे इरसाल गोष्टी व किस्से या जातकुळीत बसणारी त्यांची कथा नाही. असे लेखक स्पष्टपणे कथासंग्रहात शेवटी लिहिण्यामागची 'भूमि'का या भागात आपली भूमिका मांडताना ठामपणे सांगतात. माझी कथा ही ग्रामीण कथा नसून या कथांचा लिहिण्याचा परिसर जरी ग्रामीण असला तरी या कथा माणसांच्या आणि त्याच्या जगण्याच्या आहेत. तळागाळातील माणसाचा शब्द गुदमरु नये त्याला वाचा मिळावी या अंतरिक प्रेरणेतून मी लिहितो आहे. 


ग्रामीण जीवनातील  जीवन जगत असताना नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेला, अडचणींना तोंड देताना, ग्रामीण माणसांच्या मनाची तगमग, अहाय्यता व शोषण त्याबरोबर आनंद व दुःखाचे क्षण या कथासंग्रहातील कथातून संवेदनशील रित्या लेखकाने मांडले आहेत. केवळ शेत, शेतकरी, दुष्काळ इथपर्यंत न थांबता शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया यांच्या दैनंदिन जगण्यातील संघर्ष  अतिशय तळमळीने अंतरिक उर्मीने कथातून आला आहे. माणसाच्या मनाचा तळ शोध घेताना, मनाचा तळ गाठला यायला हवा व तो आपल्याला त्या कथेच्या वा पात्राच्या अनुषंगाने आपल्या कथेत त्या कथेचा पात्र प्रसंग व निवेदनानुसार कथानकाच्या भाषेतूनच मांडता यायला हवा. 


खरंतर आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक अडीअडचणी असतात. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर सर्व स्तरावर अनेक प्रश्न उभे असतात परंतु आपण स्वतःच्या कोषात एवढे अडकलेले असतो की सभोवताली काय चाललंय तेच आपल्याला कळत नाही. आपल्या जाणिवा बोथट होत जातात. आपण काळानुसार समुहा बरोबर न चालता वैयक्तिक आपले जीवन जगण्यात मशगूल झाले आहोत.   आणि नेमका हाच धागा लेखक आसाराम लोमटे यांनी आपल्या या कथासंग्रहात पकडला आहे. काळानुसार बदलणारे प्रश्न व बदलती संवेदना यांचे सामुहिक जीवन जगताना अनुभवाच्या पातळीवर होणारी मनाची घुसमट व अस्वस्थता त्यांनी आपल्या कथांतून मांडली आहे.  त्यांची कथा ही समूहाची कथा आहे.


तसे पाह्यले तर विसाव्या शतकाचा प्रवास चालु आहे. ग्रामीण भागात आता बरेच बदल होत आहेत, या अनुषंगाने ग्रामीण भाग नागर होत चालला आहे. आलोक मधील कथा या निमशहरी ग्रामीण जीवनाच्या वर्तमानावर भाष्य करणाऱ्या आहेत. शेतकरी हे ग्रामीण जीवनाचं मुख्य अंग आहे. शेती हा परंपरागत व्यवसाय व अनुषंगानेच येणारे प्रश्न, निसर्गाचा प्रकोप, दुष्काळ, अज्ञान, गावातलं राजकारण अशा अनेक विषयांना हात घालत ग्रामीण जगण्यातील ज्वलंत व जिवंत अनुभव आपल्यासमोर वास्तव जगण्याच्या पातळीवर लेखकाने उभे केले आहेत. वास्तविक दृष्टिकोनातून ग्रामीण माणसाच्या जगण्यावर प्रकाश टाकणाऱ्या या कथा साहित्यिक मुल्यांच्या पातळीवर सर्वांगाने उतरल्या आहेत. 


ग्रामीण जगणं जगत असताना काळ्या मातीशी नाळ जोडलेल्या व  त्या मातीतूनच उभारीने उभं राहून उगवलेल्या प्रत्येक नव्या दिवसाच्या चांगल्या बऱ्या वाईट अनुभवाना तोंड देत चार उन्हाळे-पावसाळे पाहिलेली,  समोर उभ्या परिस्थितीशी जुळवून घेताना होत असणारा प्रासंगिक संघर्ष, मनातील अस्वस्थता व त्याच बरोबर त्या पात्र व्यक्तिरेखेबाबतचा जिव्हाळा ओलावा याची करूण छटा लेखकाने आपल्या कथानकातून हुबेहुब जीवंत चित्रित केली आहेत. त्यांच्या निवेदनातून व बोली संवादात्मक शैलीतून त्या घटना ती पात्रे आपल्याशी जीवंत बोलत आहेत असे वाटते. वास्तववादी दृष्टिकोनातून कथा मांडताना कथेला कलात्मकतेची जोड देत व्यापक आशयअंगाने पुढे येत  वाचकाच्या मनाचा तळ गाठतात व वाचकास समकालीन कालखंडाच्या चाकोरीतून समोरच्या वास्तवाकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची नवी दृष्टी देतात हे या कथासंग्रहाचे यश आहे. 


कथासंग्रह- आलोक

लेखक - आसाराम लोमटे

प्रकाशन - शब्द पब्लिकेशन मुंबई 

पृष्ठसंख्या 

मूल्य -२५० रुपये

पुस्तक परिचय- सौ.तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए- मराठी)


#आलोक


#आसाराम लोमटे


Saturday, 29 August 2020

तुझ्याशिवाय - कादंबरी




 तुझ्याशिवाय 


विनीत वर्तक व रिमा रोहणे या लेखकांनी मिळून लिहिलेली 'तुझ्याशिवाय' ही कादंबरी वाचण्याची खूप उत्सुकता होती. खरंतर ही कादंबरी हातात पडताच प्रथमदर्शनी या कादंबरीबद्दल मनात एक कुतूहल निर्माण झालं. कारण मी बरीच पुस्तके हल्ली वाचली व काही माझ्या संग्रहीही आहेत पण असं दोन लेखकांनी लिहिलेलं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचत होते. खरंतर विनीतची वैज्ञानिक, वस्तुनिष्ठ व अभ्यासू लेखनशैली मला ज्ञात होती. विनीतचा आताचा लेखनाचा प्रवाह, ओघ जो आहे त्यापेक्षा हा विषय खूपच वेगळा आहे. विनीत व रिमानी मिळून केलेला हा प्रयोग त्यांचा मला आवडला. व तो सफल झालाय असं नमूद करायलाही मला आवडेल. रिमानेही अतीशय उत्कृष्टपणे कादंबरी लिहिताना समतोल राखून या कादंबरी लेखनाच्या भूमिकेत एक वेगळा प्रयोग करताना निश्चितच आशयघनता आणली आहे याबद्दल तिचंही कौतुक. खरंतर असं एकत्र येऊन लेखन करणं ही तशी अवघड बाब आहे. कारण दोन लेखकांनी आपल्या विचारासह एकत्र येऊन एकसलग लेखन करणं एवढं सोप्पं नाही. कारण आता आपण एकटाकी एका लेखकाचं लेखन पाहतो तिथेही किती विभ्रम असतात, वाद जाणवतात आपल्याला. असं विचाराचं जुळणं फार क्वचितच दिसतं. या दोंघानी हे पाऊल उचललं व ते यशस्वी झालंय हे या पुस्तकाचं यश आहे.

सुरवातीला ललितअंगाने सुरू होणारी ही कादंबरी आठवणींचा गोफ विणता विणता फ्लॅशबॅकमधे आपल्याला घेऊन जाते. खरंतर प्रेम ही एक हळुवार भावना आहे. आठवण, विरह, वाप पाहणं व या आठवणीच्या वाटेवर चालणं. या वाटेवर चालताना सर्वांत पहिला हक्क कोणाचा असतो तर तिचा अथवा त्याच, अर्थात प्रेयसीचा. तिची आठवण, ती, पहिली भेट, सोबत, मनातलं, द्वंद्वं इथून सुरू होणारा या कादंबरीतील सलील व मुक्ता या मुख्य पात्रांचा प्रवास… पाहता पाहता आपला होऊन जातो. अरे हे तर आपणही अनुभवलंय असं वाटत राहतं. शाळा, काॅलेजमधे असताना आपल्या अल्लड भावनांना प्रेमाचे कोवळे नाजूक धुमारे फुटू लागतात. आणि मग हे प्रेम पहिले असेल तर मग ते चिरस्मरणात राहतेच. मग ती व्यक्ती, तिचं दिसणं, हसणं, बोलणं सगळं आवडायला लागतं. आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल ओढ निर्माण होते. प्रेमभाव निर्माण होतो. कधी आपण त्या व्यक्तीला सांगण्यात यशस्वी होतो तर कधी नाही. मग आपली अवस्था तळ्यात-मळ्यात अशी होते. कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने आपण त्या व्यक्ती जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. आणि असा एक क्षण येतो की आपण आपल्या मनातील उत्कट भाव आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतो. वाट पाहात राहतो होकाराची. मग होकार की नकार मग तिचं भेटणं पण अबोल राहणं. तिचं स्वप्नवत स्विकारणं. हे सर्व या कादंबरित अलवारपणे रेखाटताना कुठेही प्रासंगिक उथळपणा लेखकांनी रेखाटलेला आपल्याला जाणवत नाही. प्रेमरसाचे माधुर्य जाणिवपूर्वक टिपण्याचा प्रयत्न जो काही लेखक-लेखिकेने केला आहे तो खरा उतरला आहे. उत्तरार्धातील संघर्षही वाखणण्याजोगा आहे. खरंतर प्रेमातील त्रिकोण, प्रेम हे विषय कितीतरी लेखक-लेखिकांनी हाताळले आहेत. मात्र आपलं लेखन कसं वेगळं इथे लेखकांचा खरा कस लागतो व आपलं वेगळंपण सिध्द करण्यात हे दोंघ इथे यशस्वी झालेले दिसतात.

शेवटच्या टप्प्यात घर, जबाबदारी, नोकरी, प्रेम, कर्तव्य मग संसाराची स्वप्नं पाहणं, हे सगळे हावभाव सलिल व मुक्ता या पात्रांच्या अभिव्यक्तीतून अगदी सहज, ओघवत्या भाषेत विनित व रिमा या दोंघानी मांडलेत. पहिला भाग प्रस्तवनावापर ललित, मध्य मुख्य कथानक व शेवटाकडे वळताना कथेत येणारं टिवस्ट व कथेला टर्न देण्यासाठी वापरण्यात येणारं धक्का तंत्र विनीत व रिमा यांनी उत्कृष्टपणे हाताळलंय. एका विशिष्ट ठिकाणी कथानक टर्न होते तेव्हा आपसूकच कथानकाचा चेहरामोहरा बदलतो आणि आपण विचार करायला प्रवृत्त होतो की असं का घडतं ? असं का घडावं ? असं नको व्हायला ? असं झालं असतं तर ? सलीलने असा निर्णय का घेतला असता तर ? मी काय केलं असतं ? मुक्तानेही सहजासहजी पाऊल का माग घ्यावं ? तिने का हट्ट केला नाही ? कदाचीत कथानक वेगळ्या अॅगलनी गेलं असतं. आपण जसं जसं वाचत जातो. त्या कथानकात गुंतत जातो. एकरूप होतो. असे प्रश्न निर्माण होणं व एकरूप होणं हेच मला या कथानकाचं यश वाटतं. या कादंबरीतला शेवट व टिवस्ट मी इथे सांगणार नाही कारण मग पुस्तक वाचण्याची मजाच निघून जाईल. प्रेमाची जाणीवच इतकी सुंदर आहे की मग तो विरह, तो रितेपणा अन् विरक्ती, त्याग अन् मग एक पोकळी घेऊन अपरिहार्यपणे जगणं. परत त्यावाटेवर मागे परत परत वळून पाहण्याचा मोह होणं ह्या सर्व निसर्गसुलभ मानवी भावना आहेत. पण कधी कधी नियती, नशिब असे खेळ खेळते की क्षणात आयुष्याचा पटच बदलून जातो. तिथे आपण काहीच करू शकत नाही. हतबल होतो. तरीही आपण मनाचं समाधान करत कठोरपणे खोटी आस सोबत ठेवून जगत असतो. तेवढाच एक कवडसा असतो तो अधूनमधून डोकावत राहतो साचलेल्या अवकशातून. हे सर्व भावरंग विनित व रिमा यांनी अचूकपणे टिपले आहेत. अगदी  सुरवातीपासून शेवटपर्यंत ८४ पानांच्या या छोटेखानी पुुुुुुु स्तकाच्या  सुुुुरवातीपासून शेवट पर्यंत...

तनुजा ढेरे



Wednesday, 26 August 2020

रांजण कथासंग्रह-


 'रांजण' 


नम्रता पाटील यांचा 'रांजण' हा पहिलाच कथासंग्रह परवाच वाचून झाला. खरंतर खूप दिवसापासून या संग्रहावर लिहायचं होतं आणि आज ते लिहून झालं. खरंतर 'रांजण' लहानपणी आजोळी अंगणात दोन रांजण रोवलेले होते. थंडगार पाणी प्यायला मिळायचं या रांजणातून. हिवाळा असो वा उन्हाळा या रांजणातलं पाणी प्यायला गोड लागायचं. आज अशाच  'रांजण' या कथासंग्रहातील लघुकथा सुध्दा मला या गोड पाण्याची आठवण करुन देतायेत... प्रत्येक कथा जगण्याची वेगळी परिभाषा मांडते ती सुख: दुखाःच्या पलीकडची व हाच गोडवा आहे जगण्याचा तो प्रसंगी कटू वाटेल पण सत्य आहे. कारण माणसाचं वागणंच असं आहे. हेच या कथासंग्रहातून या लेखिकेने अगदी सहज मांडलंय.

सुरवातीला वरवर एकदम साध्या सोप्या वाटणाऱ्या कथा आपण वाचतो तर उमगत नाहीत या कथा. पण जेव्हा आपण मन लावून एक एक कथा वाचतो तेव्हा त्या लघुकथेतील बारकावे आपल्याला लक्षात येतात. या संग्रहातील सुरवातीची कथा 'दाह' मनाला चटका लाऊन जाते. 'कवडसे' या कथेतील हमीदा... अन् बशीर ही पात्रं वास्तवदर्शी जीवनाचे प्रतिकं वाटतात. कारण आपण नेहमी भयाण वास्तवापासून पळत असतो व हे चित्र लेखिकेने हुबेहूब या कथेतून उभे केले आहे. 'रांजण' ही कथा नीती-अनिती च्या परिभाषेतून जगण्यातील स्थितप्रज्ञता दर्शवते.

'परीस' ही कथेत 'मीरा' या बालमनोरुग्ण असलेल्या मुलींचे शोषण घरातल्या घरात होत असते मात्र घरचे अनभिज्ञ कसे राहतात हे वाचतानाच या कथेतील लालाजी हे पात्र कायम स्मरणात राहते. 'गुलाल' ही कथा अशीच प्रासंगिक अंगाने आपल्यातील सहजता अगदी विषम अर्थाने सखोल अर्थ सांगून जाते. 'फक्त साहेब', 'दिवाळी', 'सुदाम्याची भेळ' या लघुकथा छोट्याशा पण जीवनाचं मर्म पात्रांच्या संवादातून, कथेच्या निवेदनातून सहज सांगतात.

'डोंट गो प्लीज' ही थरार लघुकथा एक वेगळा अनुभव देऊन जाते. 'प्रिय' या कथेत आरशाशी साधलेला संवाद फॅन्टसीच्या जगात घेऊन जातो. 'लास्ट सीन', 'एका प्रोफाईलची गोष्ट', 'ऑनलाईन बिनलाईन', 'एक सेल्फी', ' 'मुखवटा' या लघुकथा व्हाटसअप फेसबुक विश्वाचं एक भीषण व वास्तववादी दर्शन घडवणाऱ्या लेखिकेच्या लेखनीतून अतीशय तरलपणे उतरल्या आहेत.

शेवटच्या दोन कथेतील 'नोटबंदी' ही पत्रवजा कथा आर्थिक प्रश्नावर भाष्य करते. तर रेडिओस्विटी मधील अबोली व निनाद यांची प्रेमकथा प्रेमाची व्यापकता सांगून जाते...'सांजकिनारा', 'मोगरा', 'पिंपळपान', अशा प्रासंगिक भाष्य करणाऱ्या कथा विविध विषय हातळण्याची लेखिकेची सचोटी दिसून येते. वरकरणी छोट्या वाटणाऱ्या या कथांमध्ये आत खोल अर्थ दडलेला  आहे हे आपल्याला वाचल्यावर जाणवेल. कथा वाचताना  कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. अगदी आपल्या समोर घडलेले प्रसंग आपण कानाडोळा करून जगत असतो पण तसे करू नये या बरोबरच जगताना आजुबाजूच्या प्रसंगाचं व्यक्तीच्या हालचालीचं भान ठेवावं हे लेखिकेच्या भूमिकेतून मांडायचा प्रयत्न नम्रताचा असावा असे जाणवते व यातूनच लेखिकेची संवेदनशिलता जाणवते. जगण्यातील सजगता जाणवते.

श्रीनिवास चितळे काकांचे प्रास्ताविक व लेखिकेचं नेटकं मनोगत असलेला हा ४९ लघुकथांचा १४४ पानांचा हा संग्रह 'रांजण'  नंदिनी पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला. जितू काळे याचं उत्कृष्ट मुखपृष्ठ लाभलेला. सर्वांच्या संग्रही असावा असाच आहे. 

सौ. तनुजा ढेरे

Sunday, 23 August 2020

बिगारी - आत्मकथन डाॅ.मदन देगावकर - परिचय तनुजा ढेरे

 "बिगारी "


" उन्हा-तान्हात काम करणा-या तमाम कष्टक-यांच्या घामास अर्पण. "

अतीशय सुंदर कथानक अगदी सहज, सोप्या, नितळ ,निखळ सुटसुटीत शब्दात कथानकाची मांडणी. या आत्मकथेतील कथा प्रसंगानुरूप पुढे पुढे सरकत जाते.कथेच्या नायका च्या आजुबाजू कथा फिरत  राहते. कुठे ही शब्दाचा भपकेबाजपणा नाही.ना शाब्दिक कोटया वापरलेल्या आहेत.पात्र व प्रसंग वाढवायचा म्हणून रंगरंगोटी नाही वा प्रसंग खेचलेला नाही. जीवनात आलेले अनुभव व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभा करणं हे  लेखकाला छान जमले आहे.एका गवंडयाच्या हाता खाली रोजंदारीवर काम करणा-या  एका मुलाची ही कथा. एक लेखक बालपण, तारूण्य शिक्षण, प्रेम, नोकरी व संसार असा हा जीवन अनुभव अनुभवताना आयुष्याशी झगडताना  नात्यांची  गुंतागुंत व ती सोडवताना भावनांची  होणारी ओढाताण, तगमग अतीशय तरलपणे शब्दबध्द केलीय बिगारी या आत्मकथनाद्वारे.

लेखकाला बालपणापासुन असलेली संगीताची आवड, काॅलेज जीवनातील विविध प्रसंग व त्याचबरोबर आयुष्यात भेटलेल्या नाना विविध व्यक्ती त्यांचे स्वभाव व त-हा कथेतील पात्रे व त्या अनुषंगाने लेखकाच्या मनाची अवस्था प्रसंगानुरूप लेखकाचे निर्णय व परिस्थिती कशी जीवन जगायला शिकवते. जीवनात संघर्ष आहे व  या संघर्षातून तो कणखर बनत जातो...हे लेखकाची शिकण्याची जी जिद्द आहे त्यातून दिसुन येतं. लेखकाच्या आतमधे लपलेला एक कवी हा जागोजागी आपल्याला भेटत राहतो.त्या काळात 'शबनम' चं आकर्षण व नंतर शबनम वाटणे.या कथेत भावलेलं पात्र शुभांगी ही प्रेयसी ,तीचं नायकाला प्रोत्साहन देणं. त्याच्यासाठी तीची धडपड, शुभांगीचं प्रेम  ,निखळ ,निस्वार्थी व तितकंच भावनाशील संवेदनशील जाणवतं. अतीशय तरल जीवनाचा अनुभव शिकवूून जातं हे नातं.प्रेम आहे पण परिस्थिती कसे जीवनाचे मार्ग बदलायला भाग पाडते हे या कथानकातून लेखक मांडतो. नायक हा प्रेमभंगातून डगमगत नाही . खरंतर तो प्रेमभंग नाहीच तर ...तो स्विकार्य निर्णय आहे. तो यातून ही उभा राहतो हरत नाही. सुमा मायची लेखकावरील माया ,याच बरोबर  आई,आजी ,बहीण घरावरची माया.. स्वतःचं आयुष्य उभारण्या साठीची तगमग व यासाठी करावे लागणारे संघर्ष व जीवनातील प्रसंग खूप आखीव रेखीव अनुभवाच्या चौकटीतून मांडताना लेखकाच्या मनाचे व व्यक्ती पात्रांना सामोरे जाण्याची प्रासंगिक चपखलता दिसुन येते छोटया छोटया निर्णयक्षमतेतून.

या कथेतील प्रत्येक प्रसंग रेखाटताना प्रसंग जसा जसा पुढे सरकतो तशी तशी उत्सुकता वाढत जाते...व पुस्तक आपण वाचत पुढे जातोच....शैक्षणिक काळ, बिगारी चं काम करतानाचा प्रसंग व सुपरविजन करतानाचा प्रसंगात भावतो तो लेखकाचा सच्चेपणा.येढाई च्या मंदिरातील नारळ विकण्याचा  प्रसंग असो वा स्वतःच्या लग्नात घेतलेला निर्णय. स्वत:चं लग्न जमवण्यासाठी सास-यांना हुंडयासाठी स्वत:च्या आईला देण्यासाठी स्वत:च पैसे देतो. स्वत:च  नवरदेव असुन ही सगळी कामं करतो ती ही अगदी प्रामाणिकपणे. पहिली मुलगी झाली म्हणून नाराज न होता सात किलो पेढे ऑर्डर देणारा लेखक. अगदी आई व सुने मधला घरगुती प्रसंग आणि आजी वरची माया...यातून नायकाचा सच्चेपणा उतरतो .राणू शेरडी वर लिहिलेल्या प्रसंगावरून प्राणीमात्रावरील प्रेम दिसून येते.या आत्मकथेतून जीवन जगण्याची धडपड आणि प्रसंगाला सामोरे जाताना जाणवते ते प्रकर्षांने लेखक स्वत:च्या आयुष्यात कधीही कडवटपणा येऊ देत नाही. कथेतून लेखकाचं संगीतावरचं प्रेम व त्या अनुषंगाने रंगवलेले भगवंताच्या मंदिरातील प्रसंग. अप्रतिम अगदी समोर घडणारे. स्वत:हुन खरंतर बिगारी हा व्यवसाय शिक्षणासाठी स्विकारलेला व त्यातून स्वतःच्या पायावर उभा राहुन स्वकष्टाने पुढे आलेल्या या कवीचं २००६ मधे झंझावात हा काव्यसंग्रह प्रकाशित व आता बिगारी त्यांचा साहित्य क्षेत्रातील एकुन प्रवास  व हे आत्मकथन पाहता लेखकाचा साहित्या प्रतीचा ध्यास दिसून येतो.साहित्यिक कवी लेखक गझलकार तुकाराम पाटील यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे ते या पुस्तकाबाबत  लिहतात, अनुभवसंपन्न जगणं म्हणजे काय ? हे वाचकांना या आत्मकथनाने समजेल.लोककवी.प्रा.प्रशांत मोरे यांनी मलपृष्ठावर या पुस्तका बाबत लिहीले आहे, " बिगारी आत्मकथनाने समाजातील दुबळी पिढीत माणसे उभी राहतील. " नवा संघर्ष पेरतील या उमेदीने नवी आशा घेऊन मदन देगावकरांचा..बिगारी नावाचा झंझावात आपणांस साद घालतोय,बिगारीचे आपण स्वागत करुया..या पुस्तकाचं मुखपृष्ठ कोपरगावचे कवी व चित्रकार अरविंद शेलार यांनी खूप अर्थपूर्ण रेखाटलंय. युगंधर प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं  हे आत्मकथन पर पुस्तक आपण रसिक वाचकास नक्कीच आवडेल...

" बिगारी - कवी.लेखक ,मदन देगावकर - दंदाडे "
युगंधर प्रकाशन ---पुणे
सरस्वती बुक डेपो -पुणे
सौ. तनुजा ढेरे


Thursday, 13 August 2020

पुस्तक परिचय - कादंबरी काळीजकाटा- तनुजा ढेरे

 


पुस्तक परिचय-  काळीजकाटा - सुनील जवंजाळ

सुनील जवंजाळ हे मुळचे सोलापूरचे साहित्यिक आहेत. त्यांचा 'वेदनेचा पाऊलखुणा' हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. यानंतर त्यांची ही प्रकाशित पहिली यशस्वी कादंबरी. खरंतर एक अभ्यास म्हणून या कादंबरीचा विषय मला खेचत होता. कादंबरीत लेखकाने वापरलेली अतीशय लाघवी ओघवती भाषा, उभा केलेले प्रसंग, ग्रामीण पात्रं व त्यांच्यातील संवाद काळजाला भिडणारे आहेत. कादंबरी वाचताना ही पात्र अगदी आपल्या अवतीभवती वावरतायेत असंच वाटतं. निसर्ग व मानवी भावना संवेदना याचं अतूट नातं लेखनातून दिसून येतं. मुळचा कविचा आत्मा असल्यामुळे लयबध्द भाषा आणि आवश्यक तेथे कविता वाचताना लेखकाची तरल स्वभाववृत्ती यातून दिसून येते. एक लेखक-कवी म्हणून वेदनेचा काटा सलणारा शब्दातून जागोजागी लेखकाला सलत राहातो हे जाणवते. मात्र यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. 

खरंतर  'सावली' ही या कादंबरीची नायिका एका शेतकऱ्याची मुलगी. कवयित्रि. तीचं भावविश्व अतिशय, हळवं, नाजूक, सुंदर आणि भावस्पर्शी रित्या लेखकाने रेखाटले आहे. खरंतर सावली या कवयित्रिच्या अंतरंगात आपण आपल्या पाहातो... व पुढे  पुढे ही कादंबरी वाचत जातो. मूळ मला लिहिण्याची आवड असल्यामुळे सावलीत असलेली लेखिका मला भावली असेलही पण ज्या पध्दतीने तिचे शाररिक व मानसिक  शोषण होते, एक कवयित्रि व लेखिका म्हणून ते काळजाला शेवटपर्यंत काट्याप्रमाणे टोचत राहते. सावलीच्या भूमिकेतून लेखकाने स्त्री लेखिकांच्या जीवनातील वास्तव प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे असं मला वाटतं. सावलीचं कोवळं मन, तुकाराम वडिल, राधाबाई आई यांच्यातले भावूक संवाद काळजाला भिडणारे आहेत. या कादंबरीत रेखाटलेली सावली तिची वाचनाची आवड, कविता, यातून अदृश्यरित्या  लेखक व कवी यांच्या मनातील वेदनेची छटा जाणवत राहते. कादंबरीत एका लेखकाचे आत्मवृत्त हे लेखकाने कथेतील सावली वाचत असलेल्या पुस्तकाच्या माध्यामातून अदृश्य कथानकाद्वारे मांडले आहे. त्यातून ही सावलीला जगण्याची जिद्द  मिळत असते मात्र त्या लेखकांचे आत्मवृत्त वाचताना त्याचा संघर्ष, तळमळ, वेदना, यश-अपयशाचे अनेक काटे कसे तिलाही सलत राहतात ते लेखकाने उत्तमरित्या मांडले आहे. फक्त या ठिकाणी वाटते की या पुस्तकरूपी लेखकापेक्षा वसंताला अजून रेखाटलं असतं तर त्याही पात्राला योग्य न्याय मिळाला असता. वाचताना रंगत आली असती. पण तो लेखक अभिव्यक्तीचा भाग आहे.


खरंतर वेदना, विरह म्हणजेच प्रेम. सावली ही या कादंबरीची नायिका व वसंता हा नायक आहे. वसंताचं संगीतावरचं प्रेम, ज्ञान, त्याची समजून घेण्याची व समजवण्याची भाववृत्ती, त्याचं अतिशय संवेदनशील मन व गोड आवाज त्यातील प्रेमळतरल अनुभूती आणि सावलीची कविता जेव्हा हातात हात घालून कथानक पुढे जाते तेव्हा हळवा वसंता सावलीच्या मनाचा हळवा कोपरा पोखरत राहतो. प्रेम, लग्न, समाज, रूढी, परंपरा या सर्व समाजमान्य रूढीच्या जोखडात बांधलेल्या या प्रेमी युगलाची  ही कथा व यांच्या आजुबाजूची पात्रं आपल्यासमोर शब्दांच्या माध्यामातून हुबेहुब उभे करण्यात लेखक या कादंबरीत यशस्वी झाला आहे. म्हणूनच ही कादंबरी जीवंत वाटते. या कादंबरीचे कथानक आपलेसे वाटते हे या कादंबरीचे यश आहे.

केवळ प्रेम, त्याग नव्हे तर शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा, समाजातील वैचारिक तफावत, स्त्रियांचं शोषण, साहित्यिक प्रश्न या सर्वांवर भाष्य करणारी ही कादंबरी व्यापक अंगाने पुढे जाते तेव्हा वाचतच राहावे असं वाटत राहातं. मात्र एका ठिकाणी ती येऊन ठेपते तेव्हा वाटतं अजून लेखकाने लिहायला हवं होतं. अजून वसंता व सावली यांचा एक भाग यायला हवा, लोंकासमोर एकच बाजू आली. एवढ्यात संपायला नको हे कथानक. मनात कुठेतरी सावली अधुरीच वाटते. सावली व वसंता या पात्राला न्याय मिळायला हवा. आणि असा विचार करता क्षणी माहिती मिळाली की कादंबरीचा दुसरा भाग येणार तेव्हा हे ऐकून समाधान झाले. या पुढचा भाग वाचायची उत्सुकता खूप आहे. पुढच्या लेखनास लेखकास खूप खूप शुभेच्छा. खरंतर  पूर्ण कथानक न मांडता या कादंबरीबद्दल संक्षिप्त लिहिले कारण  सगळेच लिहिले तर कादंबरी वाचण्याची मजाच निघून जाईल. तरीही या कादंबरीतलं एक वाक्य आवडलेलं…



" काळजातला शब्द कागदावर आला की, काळीज हलकं वाटू लागतं आणि कागद जड होतो..! कागदावरचा शब्द माणसात गेला की कागद हलका होतो आणि माणूस जड होतो..! शब्दांच्या विचारानं जड झालेली माणसं समाजात चांगली वागू शकतात. "

@ तनुजा ढेरे

काळीजकाटा - कादंबरी - लेखक सुनिल जवंजाळ.संपर्क-९४०४६९२६६२

चपराक प्रकाशन पुणे. संपादक- घनश्याम पाटील.

७०५७२९२०९२




Monday, 10 August 2020

पैंजण कथासंग्रह - मोहना कारखानिस

 

पैंजण



कथा वाचायला कोणाला आवडत नाही सांगा. लहान लहान चटकदार खमंग खुसखुशीत तर कधी कधी हळव्या भावभावनांची गुंफण करत नाट्यमयरित्या पुढे जाणारी कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. कथासंग्रह वाचनाची ही आवड मला नेहमी नवनविन लेखकांच्या कथालेखनाकडे  आकृष्ट करते, कारण कथालेखनाच्या बदलत्या प्रवाहात आजच्या काळातील ही नवकथा आपल्या मला अधिक मनोविश्लेशषक वाटते. या नवकथा संवादी व प्रवाही होतानाच त्या थेट वाचकाच्या मनात शिरून आपलं अस्तित्व व्यापून टाकतात असं वाटतं. 'पैंजण' हा कथासंग्रह असाच मोहना कारखानीस या लेखिकेचा अलिकडील काळात माझ्या वाचनात आला आणि या कथासंग्रहातील कथा वाचताना मी इतके रमले की वेळ कसा निघून गेला तेही कळले नाही.


कौंटुबिक नातेसंबंध, प्रेम- विरह, सुख-दुःख, हेवे-दावे, सामाजिक जाणिवा व अंतरीक भावनिक अंदोलनं मांडताना या कथासंग्रहातील पात्रं, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, स्वभाव यांचे अचूक वर्णन, बारीक-सारीक गोष्टीचे तपशील लेखिकेने नेमकेपणाने टिपले आहे व ते वाचताना आपण त्या कथासंग्रहाचा एक भाग होऊन जातो. तरल वास्तववादी, भवतालचं जीवनदर्शन घडवणारे प्रसंग व ठसठसशीत व्यक्तीचित्रं हे या संग्रहाचं वैशिष्टयै मला हा कथासंग्रह वाचताना जाणवलं. 'डाळबीटी' ही  खुसखुशीत, 'लेखिका पत्नी' ही नर्मविनोदी, तर 'व्हॅलेंटाईन डे' हे नविनच लग्न झालेल्या मुलीची स्वप्नाळू कथा. माॅल संस्कृतीवर भाष्य करणारी 'माॅल' ही कथा. अशा वेगवेगळ्या आशयाच्या सव्वीस कथा या कथासंग्रहातील मनोरंजन करतानाच विचार करायला लावणाऱ्या, वाचताना आपसूकच कधी कधी चेहऱ्यावर हसू उमटते तर कधी आपल्या पापण्याच्या कडा अलवार का होईना हळव्या होतात व ओलावतातच.


'पैंजण' ही कथा या कथासंग्रहातील मध्यवर्ती कथा असून, 'नमू' या गरीब तरूणीची. चांदीचं पैंजण घालायला मिळावं एवढंच स्वप्न तिचं, पण स्वप्नांच्या जगात ती एका तरुणाच्या बोलण्याला भुलते व फसते, याचं हृद्यद्रावक चित्रण या कथेत लेखिकने केले आहे. 'आहेर', अग्निदिव्य, ब्युटीपार्लर अशा छोटेखानी कथांतून लेखिका आपल्या मनात आपसूकच तिच्या कथाविश्वातील एक एक कथामणी ओवते. हा कथासंग्रह वाचताना संवादात्मक ओघवत्या शैलीमुळे या कथासंग्रहातील सर्वच कथा  वाचक या नात्याने मनात घर करून राहयल्या व पैंजणातील घुंगराच्या सुरेख नादाप्रमाणे माझ्या मनात किनकिनत राहिल्या व कितीतरी दिवसांनी एक चांगला कथासंग्रह वाचायला मिळाला याचं समाधानही मिळालं.



तनुजा ढेरे


वळणावरती - श्याम पेंढारी

 

वळणावरती


मला कादंबरी हा गदय प्रकार वाचायला खूप आवडतो. एक सलग मोठी कथा, विषय वाचताना मन त्यात गुंतत गेले व पुढे  काय ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली की मग वाचतच राहावं असं मला वाटतं. अशीच एक कादंबरी परवा हातात आली अलमारीतील पुस्तकं चाळताना, मग काय वाचायला घेतली आणि सलग एका बैठकीत वाचून काढली. वाचनाची उत्कंठाच इतकी होती की पुस्तक हातातून खाली ठेवावे असे वाटत नव्हते.


हर्ष व पद्मा सौदामिनी/ मीना यांच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी ' वळणावरती'. लेखक श्याम पेंढारी यांची. प्रेम हा विषय केंद्रबिंदूला ठेवून अतीशय सहज ओघवत्या भाषेत लालित्यपूर्ण, नाट्यमय रितीने ही कादंबरी पुढे सरकत जाते, निर्मळ मैत्र व त्यातून जोडलं गेलेलं अंतरीक प्रेमाचं नातं, जेव्हा जबाबदारी आणि लग्नाच्या नाजूक बंधनात स्वतःला बांधून घेऊन, हर्ष जो एका समाजसुधारकाचा मुलगा वकिल आहे व  त्याच्या बरोबर संसार करायचा निर्णय पदमा साॅलीसिटर मेहता यांची हुशार व करारी मुलगी. सामाजिक, राजकीय, कौंटुबिक, जाणिवांची हर्ष जाणीव करून देतो तेव्हा ती प्रेमासाठी व आपल्या संसारासाठी सर्व जाणिवांचा स्विकार करून हर्ष बरोबर लग्न करते. मैत्र, प्रेम, कुंटुंब, समाज आणि जबाबदारी या अंगाने पुढे जाताना ही कादंबरी आयुष्यातील हळवे नाजूक भावनिक नाते प्रसंग सांभाळून यशस्वीपणे कसा प्रवास करतात हे अतीशय छान लिहिलंय. ललितअंगाने जाणारी ही कादंबरी ग्रामीण व शहरी जिवनाचे चित्र अतीशय तरलपणे लेखक डोळ्यांसमोर उभे करतात. कादंबरी वाचताना जो जीवनाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपण वाचतच राहतो. अजून पुढे काय ? ही उत्सुकता लागून राहते.


आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना आपण काही माणसं गमावतो व काही अचानक आपल्यापुढे मैत्रीचा, प्रेमाचा हात पुढे करून उभी राहतात. शेवटी नशिबाचा भाग ही आलाच, वेळ आली, वरून बोलावणं आली की आपण कोणालाही थांबवू शकत. पण अनेक समस्यातून मार्ग काढत समंजसपणे जीवनातील अनेक कठिण प्रसंगात हार न मानता. अधिक विचारांने जीवनाचा गुंता न वाढवता. आहे ते सपष्ट बोलून, सरळपणे समोरच्या परिस्थितीच सकारात्मक दृष्टीकोनातून  स्विकार करून समाधानी जीवनपध्दतीचा अवलंब करणारी या कादंबरीतील सर्वच पात्रे भावली व सकारात्मक शेवटही एक वाचक म्हणून मनाला भावला. तरल कादंबरी लेखनाचा एक उत्तम पाठ हे पुस्तक आहे. म्हणूनच या कादंबरीतील ही पात्रे अजूनही माझ्या मनात कोरली गेली व प्रसंग डोळ्यासमोर उभी राहतात. आपणही वाचाच आपल्याला वाचायला आवडेल अशी ही कादंबरी 'वळणावरती'.


तनुजा ढेरे

Sunday, 2 August 2020

रूमणपेच सु.द.घाटे पुस्तक परिचय तनुजा ढेरे

रूमणपेच - समाजमनाचा वास्तव आरसा


कुठलाही कथाकार घ्या, कथेचं जग हे त्याच्या कल्पनांच्या मनोऱ्यावर जरी उभे असले तरी त्याच्या स्वअनुभवाची लकेर त्याच्या लेखनातून आपल्याला दिसतच असते. तो स्वतःला आपल्या अनुभवापासून अलिप्त ठेवून कुठलंही लेखन करूच शकत नाही. कुठेना कुठेतरी त्याला भेटलेली माणसे, अनुभवलेले प्रसंग, घटना, स्थळ, मनात बिंबलेले असतातच व  यासर्व बाबी ती पात्रं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष रित्या लेखकाच्या लेखनातून प्रतिबिंबीत होत असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आहे की आपल्याला लिहिताना समजतही नाही की हे पात्रं कसं साकारलं आपण. अगदी नकळत मनाच्या गाभाऱ्यात तळ ठोकून बसलेली  ही पात्रं सहज एखाद्या व्यक्तीचा चेहरा घेऊन उभी राहतात व आपलं लेखन जीवंत करतात. व वाचकाला आपल्या जीवनातील ज्वलंत वास्तविक, प्रसंगावर, प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात. 


या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील  शीर्षकाकडे मी जेव्हा पाहिले तेव्हा  'रूमणपेच' या शीर्षकातच पेच हा शब्द असल्याने नेमका कुठला पेच मनातला कथालेखकाने मांडला आहे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला व हा कथासंग्रह मी वाचायला घेतला. सुरवातीची एक कथा वाचायला घेतली अन् मग एक एक करत सर्व कथा वाचत गेले.  पुस्तक हातात घेतलं तेव्हा मनात उत्सुकता निर्माण झाली रूमण पेच म्हणजे नेमकं काय ? आणि ही उत्सुकताच मला या संग्रहातील प्रत्येक कथेकडे घेऊन गेली. आणि खरंच आहे जेव्हा आपण हा कथासंग्रह वाचत जातो तेव्हा लेखक त्याच्या मनातले पेच मांडतोच पण आपल्या मनात अनेक प्रश्न, पेच उभे करतो की असे का ? असे का यांच्याबरोबर घडते ? अशी का वागणूक त्यांना दिली जाते व त्यांच्याकडे अशा खालच्या नजरेने का आपण पाहतो. एक माणूस म्हणून त्यांनाही समान न्याय हक्काने जगण्याचा हक्क आहेच की. 


अशा प्रकारे ग्रामीण अदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या लेखक सु.द.घाटे यांनी आपल्या पहिल्याच कथासंग्रहात वाचकाच्या मनाचा ठाव घेतला आहे. केवळ समाजातील प्रश्नांवर बोट न ठेवता समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून जगताना माणसाच्या माणुसकीची विविध चांगली वाईट रूपं पाहिलेली, अनुभवलेली शब्दबध्द करतात. व्यक्तीच्या अभिवृत्तीवर भाष्य करणारा हा कथासंग्रह मला वाटतो. अस्सल ग्रामीण बोलीभाषेतून लिहिलेल्या या कथा आपल्या ओघवत्या व चटकदार निवेदन व संवाद शैलीमुळे मनावर चटकन पकड घेतात. या कथासंग्रहातील कथांची शब्दकळा आपल्याला या कथा वाचताना कथेत गुंतवून ठेवतात. प्रथमपुरूषी निवेदनात्मक शैलीतून लिहिलेल्या या कथा, आत्मकथनाकडे झुकणाऱ्या, वास्तवाच्या चौकटीतून आपल्याला न दिसणाऱ्या, नेहमीच पडद्यामागे जगणाऱ्या खालच्या स्तरातील मागास जगाचं आतलं जगणं परखडपणे मांडताना दिसतात. कुठेही नाट्यत्मकता व ढोंग बाजी दिसून येत नाही. लेखकाच्या मनातील अस्वस्थता, घालमेल दिसून येते. मागास जमातीतील लोंकाचं खरं जगणं आपल्यापर्यंत पोहचवण्याची तगमग दिसून येते. समाजातील अंधश्रध्दा, रूढी, परंपरा, अस्पृश्यता, जातीव्यवस्था, दलीत-मागास, अदिवासी, भटके-विमुक्त, यांचे प्रश्न मांडताना समाजव्यवस्थेचा खोटा बुरखा फाडून समाजाचं खरं रूप या कथाद्वारे लेखकाने आपल्यासमोर मांडलं आहे. ''हुरहुरत्या दिवट्या', 'तांडा', 'सकोन' या कथा भटक्या-विमुक्त अदिवासी जमातीचे दु:ख मांडतात. 'कंदोरी' 'भराडा' या कथा जुनाट अंधश्रध्दा, रूढी, परंपरेला वाचा फोडतात. 


या कथासंग्रहाचा गाभा असलेल्या  'रुमणपेच' या कथेचा विचार करू, जुनाट रुढी फरंपरा मनात ठसलेल्या अंधश्रध्दा यावर मार्मिकपणे भाष्य करणारी ही कथा. कथेत 'बा' ला झाडाच्या एका फांदीवर एका कावळीवर दुसरा तिचा जोडीदार कावळा बसल्याचं दिसतं. अन् त्याच्या काळजात धस्स होतं. मरण दारात उभं आहे असं समजून ते संकटं दूर होण्यासाठी त्याची माय मग आपला बा मेल्याचा खोटा सांगावा गणगोतात पाठवून, चार पाहुणं गोळा करून हुर्दा फोडला. कावळा-कावळीची ब्याद व्हती हे सांगून गोडधोड, खानं-पिणं, सोयरेपण, जोडआहेर केले व या खोट्या भ्रमात त्यांच्याजवळची एकवर्षात जमवलेली जमापुंजी संपते. अन् कर्जाचं छाताडंवरलं ओझं ठळक होतानाच, 'कावळाकावळीच्या रूमणपेचात मायीची मान अजूकबी पक्की रूमणपेचात अडकून पडली व्हती.' असं लेखक लिहितो तेव्हा ती रूमणपेचाची गाठ आपल्या काळजात खोलवर रुतल्याशिवाय राहत नाही.


'सागोती' ही कथा 'भीमा'  या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलाची कथा. मूठभर सागोतीसाठी तो शाळा सोडून 'सटवामोट्या' अन् 'झरकानदा' बरोबर जातो व त्या खाटकांना मदत करतो. परंतु आपल्या हिस्सयाचा वाटा मिळाल्यावर कुत्री त्या वाट्यावर झडप घालतात. तो कुत्र्याना हिसकावून त्यांच्या तोंडातले मांसाचे तुकडे खाली पडलेले परत  उचलतो व चिरटगुटात बांधून कसातरी घरी येतो तेव्हा एकिकडे त्याची माय त्याचं कौतुक करते तर दुसरीकडे भीमाचा बाप भीमा  शाळेत गेला नाही हे कळल्यावर घरी येऊन त्याला मारतो. तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहणारे क्रांतीचे चित्र आणि मनातील विचार धगधगतात. आपल्या आवडीचे अन्न खायला आपल्याला मिळत तर नाहीच वरुन हा जातीव्यवस्थेच्या पगडा मानगुटीवर बसलेला आपल्याला शांतपणे जगूही देत नाही, ही धग संपवण्यासाठीची उर्मी मनात निर्माण करणारी ही कथा आपल्याला समाजातील जुनाट जाती- वर्ण व्यवस्थेच्या विचारात अडकलेल्या समाजाच्या विरूध्द विचार करायला प्रवृत्त करते. 


'चहा' ही जातीव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करणारी कथा लेखकाचं आत्मकथन मांडते. या कथेत लेखकाची जिद्द, शैक्षणिक व मानसिक संघर्ष यातून गवसलेली आनंदाची वाट लेखकाच्या जीवनात आलेले सुखाचे चार क्षण आपल्या सोबत वाटतो. तेव्हा लेखकाचा सुखाची व्याख्या कळते. जेव्हा केव्हा त्याला समाजात इतर लोंकासोबत समान वागणूक मिळते, हक्क मिळतात तेव्हा त्याचा चेहऱ्यावरचा आनंद ओंसडून वाहताना आपल्याला दिसतो. 'भोजन पात्र' ही कथा अस्पृश्यतेवर भाष्य करताना लेखकाच्या मनात असलेली  तगमग स्पष्ट करतात. 'गावठाण' या कथेत चोरी करणे हे वाईट काम आहे व साक्षरतेने प्रश्न मिटू शकतात हे या कथेतील 'बा' आपल्या लेकराला तळमळीने सांगतो तर 'गंगू चुडबुडके' या कथेत जुनाट रूढी परंपरा अंधश्रध्दा यावर विश्वास ठेवणारा समाज आपल्या शारिरीक व्याधीवर मंत्र-तंत्र हा उतारा नाही तर दवाखाना व डाॅक्टरांचं औषधपाणी हेच उपाय आहेत हे या कथेतून लेखकाने अतीशय उत्तमरित्या सांगितले आहे.


 'जोगुळ' 'अळंका' 'तीन तलाख' 'मुराळी', 'सोयरीक', 'कातबोळ' अॅबार्शन या कथा स्त्री प्रश्नावर आधारीत आहेत. बाईमाणूस म्हणून होणारी जीवाची होरपळ, तगमग, धरसोड व असहाय्यता, सुख व दुःख याचे भावविभोर चित्रण या विविध कथानकातून लेखकाने मांडले आहे. अशा प्रकारे विविध प्रसंगाद्वारे पुढे जाणाऱ्या,' चरपाटा', 'आखर', 'जळती गोंधडी' अशा विविध आशयाचा विविध प्रश्न मांडणाऱ्या एकतीस कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. अदिवासी, मेंढपाळ, गुराखी, कष्टकरी, पददलीत, भटक्या विमुक्त जातीचं, उपेक्षिताचं जगणं मांडतात त्याचबरोबर समाजातील बुवा-बाजी, अंधश्रध्दा, स्पृश्य-अस्पृश्य यावर भाष्य करून समाजीक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम यासंग्रहाद्वारे केलं आहे. कथेचं अवकाश तसं पाह्यलं तर आपल्या शब्दात न मावणारं व त्यात कितीही भावरंग भरले तरी अर्धवटच राहणारं मात्र सु.द.घाटे यांनी नेमक्या व अचूक शब्दचित्रात आपल्या या कथा बांधल्या आहेत म्हणून त्या वाचनीय झाल्या आहेत. लेखक सु.द.घाटे यांच्याकडे कथालेखनाला आवश्यक असते ती चिंतनशील वृत्ती आहे. समाजभान आहे. व उपेक्षितांना न्याय मिळावून देण्याचा प्रयत्न करतानाच अशा लोंकाना साक्षरतेचे महत्व पटवून देऊन आपणच आपल्या न्याय हक्कासाठी लढले पाहिजे व या जुनाट परंपरेचे पेच सोडवले पाहिजे तरच आपला विकास होईल व जगणं सुधारेल हा आशादायी विश्वास देतात म्हणूनच या कथासंग्रहाची नोंद मराठी साहित्यात घेतली जावी असे मला वाटते. 



पुस्तक परिचय लेखन- तनुजा ढेरे

कथासंग्रह - रूमणपेच

लेखक- सु.द.घाटे( नांदेड)

भ्र-९४०५९१४६१७

प्रकाशक- गणगोत प्रकाशन (नांदेड)

भ्र- ९६६५६८२५२८

मुखपृष्ठ- विष्णू थोरे

मूल्य- २१०











'ती'च्या मनातलं विनोद पंचभाई कथासंग्रह परिचय - तनुजा ढेरे

'ती'च्या मनातलं:- स्त्री मनाचं हळवं कणखर भावविश्व'


नेहमी नवं काहीतरी वाचण्याची सवय, मध्यंतरी पुण्याला गेल्यानंतर चपराक प्रकाशनाची काही पुस्तकं वाचण्यासाठी घेतली होती. त्या पुस्तकातील 'ती'च्या मनातलं'  हे लेखक विनोद पंचभाई याचं पुस्तक खूप भावलं. ते भावलं या अर्थाने की त्यातील पहिलाच लेख 'जगी ज्यास कोणी नाही' वाचला अन् मन हळवं झालं व हळव्या मनाने पुढे वाचतच गेले. एकूण पंधरा लेखांचा समावेश असलेलं, स्त्रीयांच्या मनोभूमिकेतून एका लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक वाचताना विशेष उत्कंठा वाढवतं. स्त्रीयाच्या भूमिकेतून, स्त्रीयांचे हळवे मन समजून घेऊन त्याच शैलीतून त्यांनी हे लेख आपल्या शब्दांतून जिवंतपणे चितारले आहेत. चपराकच्या कार्यकारी संपादिका सौ.शुभांगी गिरमे यांची अतीशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या लेखसंग्रहास लाभली आहे व थोडक्यात पण आशयगर्भ असं आपलं मनोगत पंचभाईंनी मांडलं आहे. 


राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे ते पाईक आहेत. पोलीस प्रशासनात बिनतारी संदेश विभागात काम करतानाच सेवानिवृत्त झालेले पंचभाई, यांना लहानपणापासूनच वाचनाची-लेखनाची आवड होती व सोबत हे अनुभवाचे संचीत ही जमा होत गेले. अतीशय हळवं व संवेदनशील मन ही जमेची बाजू एक लेखकाच्या भूमिकेतून त्यांच्याकडे आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणारं व मानवतेचा संदेश देणारं त्याचं लेखन आहे. पंचभाई मूळचे नागपूरचे, सद्या पुण्यात निवास करतात.  २०१४ मधे त्यांचा पहिला लेखसंग्रह 'थोडं मनातलं' हा प्रसिध्द झाला.  सर्वसामान्य लोंकाच्या जीवनावर आधारीत ४५ वैचारिक लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले.  त्यानंतर  `मुलांच्या मनातलं' हा बालकथा संग्रह, संत तुकडोजी महाराज यांचं जीवनचरित्र `आपले राष्ट्रसंत', `ती'च्या मनातलं', भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद ते विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल माहिती देणारा `आपले राष्ट्रपती', क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीकारक लहुजी वस्ताद यांच्यावर आधारित `आद्य क्रांतिगुरु - लहुजी वस्ताद' इ. सहा लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यापैकी चार चपराक प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.

या लेखसंग्रहाना अनेक राज्य-स्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. एक लेखक म्हणून त्यांची मनोभूमिका व आपल्या अनुभवातून जगाकडे कनवाळू दृष्टीकोनातून पाहताना जाणवलेल्या बारीक-सारीक, घटना, वाचलेली माणसं त्यांच्या वेदना त्यांनी अचूक आपल्या लेखनातून टिपल्या आहेत.


'ती'च्या मनातील या लेखसंग्रहातून हेच स्त्री भूमिकेतून उमटलंय. स्त्रीयांची भावूकता, प्रसंगी कणखरपणे निर्णय घेण्याची क्षमता, नाउमेद ना होता शेवटपर्यंत कठोर प्रसंगाशी लढण्याचे मनोधैर्य त्यांच्यात असतेच हे आपल्या लेखातून अतीशय भावपूर्ण रित्या ताकदीने लेखकाने रेखाटले आहे. स्त्री ही एक आई, बहीण, मुलगी, मैत्रीण इ. अनेक भूमिका पार पाडत असते आणि त्या पार पाडत असताना 'ती'च्या मनातली खळबळ, तिची महत्वकांक्षा, तिच्या ईच्छा-आकांक्षा, मनोध्येयांना वाट मिळाली तर ती फुलते, नाहीतर कोमेजते. मात्र कौटुंबिक पातळीवर कधी काही प्रासंगिक अडचणी निर्माण झाल्या तर ती आपल्या ईच्छाआकांक्षाना मोड घालुन आपल्या मायेपाटी कुटूंबाला प्रथम प्राधान्य देते. हे तिच्या औदार्याचं दर्शन या लेखसंग्रहातील विविध लेखातून जाणवते.


'आता माघार घेणे नाही' या लेखातून शांतीचा संदेश देणाऱ्या व शिक्षणासाठी लढा देणाऱ्या  नोबेल पारितोषिक विजेती मलालाचा  संघर्ष, तिची शिक्षणासाठीची तळमळ  हे अनुभवकथनपर मनोगत या लेखातून शब्दबध्द केलंय. 'मी अरुणिमा' या लेखातून अरुणिमा या पद्मश्री पुरस्काराने पुरस्कारीत खेळाडूचा महत्वकांक्षी जीवनप्रवास मांडला आहे. आयुष्याची वाट चालत असताना अचानक एका प्रवासात उद्भवलेल्या संकटाला धीराने तोंड देताना तिच्याबरोबर झालेला अपघात व त्यातून आलेले अपंगत्व यावर मात करत, तिची एव्हरेस्ट शिखर सर करण्याची जिद्द व ती पूर्ण करतानाचा अनुभव थरारक आहे. 'दोघी' या लेखातून शालिनी व नंदिनी या दोन मैत्रिणींमधील हळवं भावविश्व अगदी तरलपणे, लेखकाने अतीशय सहज, सुंदर, सोप्या, ओघवत्या व प्रसंगी संवादात्मक शैलीतून 'ती'च्या मनोभूमिकेतून मांडले आहे. 


स्त्रीही भावनिक पातळीवर खूप हळवी असते आणि कधी कधी वयाच्या, अनुभवाच्या पातळीवर ती घाईघाईने तर कधी कधी अनावधनाने एखाद्या संकटात सापडते किंवा निर्णय घेण्यास चुकते पण परिस्थिती तिला जगणं शिकवते. कारण कुणाची तरी आई, बहीण, मुलगी म्हणून अथवा स्वतःचा स्वाभिमान जागा असतो म्हणून त्यांना जगवाचं लागतं किंवा जगायचं असतं. 'एकदा तरी या',  'आठ सहाची लोकल', 'चौकट' या लेखातून मांडले आहे. 'ती आहे म्हणून', 'साॅरी मी चुकले', 'कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे' या लेखातून असं कुणासाठी तरी नाहीतर किंवा स्वतःच्या महत्वकांक्षेसाठी जगण्याची उर्मीच स्त्रीयाचं अस्तित्व असतं तिची वाट असते, ही 'ती'च्या मनातली वाट लेखकाला अचूक उमगली म्हणूनच संवेदनशील मनाच्या या लेखकाने तितक्याच हळुवारपणे या लेखातील स्त्री पात्रे रंगवली आहेत. एकूणच 'ती'च्या मनोभूमिकेतून, 'ती'च्या भाषेतूनच लिहिलेले हे अनुभवकथनपर  लेख आपल्याला आपले वाटतात. केवळ स्त्रीयांनीच नव्हे तर समस्त तरुण, तरुणी, पुरूष समाजातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक वाचनीय आहे. त्यांना पुढील लेखनासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा.


पुस्तक परिचय - तनुजा ढेरे

'ती'च्या मनातलं- लेखक विनोद पंचभाई

पृष्ठ संख्या-१०४/ किंमत-१३० /-

चपराक प्रकाशन,पुणे






Saturday, 1 August 2020

निर्णय कथासंग्रह - संजय गोराडे पुस्तक परिचय तनुजा ढेरे

निर्णय :- कथा माणसाच्या जगण्याची 



कादंबरीकार व कथाकार म्हणून अल्पावधीतच आपल्या लेखनाने व कार्याने सर्वांना परिचीत झालेले लेखक संजय गोराडे यांच्या कार्याची व त्याच अनुषंगाने आज त्यांच्या लेखनाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. एक लेखक आधी माणूस असतो.  आणि एक लेखक म्हणून आपलं जगणं जगताना अनुभवाची शिदोरी, अनुभवाचे संचीत लहानपणापासूनच  आपल्या मनाच्या गाठोड्यात साठवत असतो. आपल्या आवडीनिवडी जपताना मनाशी एक खूणगाठ बांधून वाटचाल करत असतो. अशीच आपली वाट चालताना छंद म्हणून नव्हे तर ध्यास व वसा घेतला आहे म्हणून लेखन करणारे साहित्यिक कवी-लेखक संजय गोराडे. लहानपणापासूनच एक स्वच्छंदी व्यक्तीमत्व, संजय गोराडे हे मुळचे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरीचे रहिवाशी. शेतकरी कुटूंबातला त्यांचा जन्म. सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त, वडील टमाट्यांचे व्यवसायिक, ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांचा उदरनिर्वाह, तरीही त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण चिकाटीने पूर्ण केले. कालांतराने घरची परिस्थिती कर्जापायी दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडून दिले. तांत्रिक शिक्षण घेत एका खाजगी कंपनीत ते नोकरीला लागले व कुटुंबाचा आर्थिक आधार बनले. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाची गोडी होती. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्यातील लेखकही नकळत आकार घेत होता. आयुष्यात अनुभवलेले चढउतार यांचे बिंब त्यांच्या मनात खोल रूजत होते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या बालमनावर झाला व ते तशाच पध्दतीने गोष्टी आणि कथा लिहू लागले. 




संजय गोराडे यांची पहिली कादंबरी २०१३ मधे 'पारडं' ही प्रकाशीत झाली. २०१५ मधे त्यांनी नाशिकमधे साहित्यकणा संस्थेची स्थापना करून नवोदीतांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. शेगाव विचारमंच वतीने  त्यांना  त्याच्या लेखनकार्यासाठी राजमाता शिलाताई राजपूत-गहिलोत  ‘साहित्यप्रतिभा’ या पुरस्काराने पुरस्कारित केले आहे. आज आपण चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'निर्णय' या कथासंग्रहाचा मागोवा घेऊया. संजय गोराडे यांची कथा त्यांच्या भावविश्वाची म्हणजेच त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंग, पात्र व घटनांशी निगडीत आहे असं मला वाटतं. माणूस हा हजारों वर्षापासून गोष्ट सांगतो व ऐकतो आहे. आपल्याला आलेले स्वानुभव इतरांना सांगायची उर्मी त्याच्या अंतःकरणात नेहमीच दाटून येते. व तो आपले अनुभव कथन करत आला आहे व या कथानातूनच कथा हा मानवी प्रवृत्तीशी निगडीत असा जिवंत वाड:मयप्रकार  आपल्या वाचत आलो आहोत. कथेचं विश्वचं निराळं असतं. तिथे आपण आपल्या अनुभवाच्या कक्षा कल्पकतेच्या जोरावर विस्तारू शकतो. आपण जसं जगतो, पाहतो, भवतालाचा अनुभव घेतो तसेच प्रतिबिंब किंवा त्याची पडछाया आपल्या लेखनातून उमटत असते. मात्र ते लेखन हा आपला अनुभव नाही तर परकाया प्रवेश करून एक वेगळा अनुभव वाचकांना देण्याचे कसब लेखकाचे असते. कौंटुबीक पातळीवर साधे साधे उद्भवणारे प्रसंग ही नात्यात दुरावे, गैरसमज निर्माण करतात. तर कधी कधी कौंटुबीक जीवन जगताना अचानक उद्भवलेले प्रसंग, ओढवलेली संकटं अवधानाने वा अनावधानाने आपल्या समोर बिकट परिस्थिती निर्माण करतात तेव्हा कोंडीत पकडल्यासारखी अवस्था होते. योग्य काय अयोग्य काय याची जाण येईतो, निर्णय घेईपर्यंत परिस्थिती वेगळंच वळण घेते. कधी कधी जवळची, रक्ताची माणसं अगदी जवळ असूनही दूर जातात तर दूरची ज्यांच्याशी आपलं काहीच नातं नसतं अशी माणसंही धावून येतात. 


घटना प्रसंगाची उत्तम मांडणी, नात्याची भावनिक गुंतागुंत, उभा राहणारे पेचप्रसंग व यातून होणारी उकल ही या कथासंग्रहातील कथांतून उत्तमरित्या लेखकाने  प्रसंगावधान राखून कथा रेखाटून, प्रसंग उभे केले आहेत. संवाद पेरले आहेत. निवदेनशैलीही ओघवती व सोपी असल्याकारणाने या कथा वाचकाला आपल्याच भवतालाच्या कथा वाटतात. जीवनातील भावप्रसंग आपल्या समोरच घडत आहे असे वाटत राहते. या कथा घटना व प्रसंगावर आधारीत निर्णयाच्या पायरीवर होणाऱ्या द्विधा अवस्थेतून बाहेर पडताना होणारी घालमेल मांडत असतानाच सकारात्मक संदेश देणाऱ्या, आशादायी चित्र रेखाटतात हे या कथासंग्रहाचे यश आहे. सरळ, सोप्या आणि सुटसुटीत अशा या लघुकथा आपली एक शैली सुरवातीपासून शेवटपर्यंत कायम ठेवतात. माणूसकीचा संदेश देणारी, जीवनावर भाष्य करणारी ही कथा आहे. ओघवती सरळ सोपी अन् सहज पुढे सरकत जाणारी ही कथा, प्रसंग घडत असताना हवे तिथेच संवाद व कथेला कलाटणी देणे ही लेखकाची लेखनशैली खास आहे. 'निर्णय' या कथासंग्रहात निर्णय, बळीराजा, संगत, मोहमाया, बीज, लोकल, कोन आणि बहुगुण अशा एकूण आठ कथा आहेत. कथानकातले प्रसंग, पात्र व एकूणच कथेचा पोत पाहता या कथा कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, नात्याच्या, शोषणाच्या व मुल्यात्मक जगण्याच्या, आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या आहेत. 


या कथासंग्रहातील कथांचा एक एक करुन विचार करुया या कथासंग्रहातील पहिलीच शीर्षक कथा 'निर्णय' या कथेचा विचार केला असता, राधिका व मोहन हे एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटूंब, पहिलं मूल बारावर्षाचं झाल्यानंतर राधिका गर्भार राहते व दुसऱ्या मूल होऊ द्यायचं का नाही याबाबत साशंक राहते व आपल्या पतीजवळ आपलं मन उघड करते. शेवटी हे दांपत्य निर्णय घेतं. एका भावंडास दुसरं भांवडं हवंच या भावनेने मूल होऊ देतः. पहिला मुलगा सतीश व नंतर रोहन असा परिवार दुसरं मूल आल्यानंतर मोठ्या भावाच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना कथा इथून पुढे सुरू होते, लेखकाने हळव्या अंतरकरणाने पुढे ही कथा रेखाटली आहे. प्रसंग नाट्यमय चितारताना शेवटही अतीशय समंजसपणे सकारात्मक केला आहे.



'बळीराजा' या कथेत कथेचा नायक दिवाकर सुशिक्षित असून,  कंपनीत नोकरीला असतो. परंतु शहरी जीवनातील कामाचा तोच तो रहाटगाडा ओढण्यापेक्षा तो वडिलांचा पांरपारिक शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो. व तो आपल्या पत्नी रेवतीसह गावी येऊन राहतो. मात्र शेती करत असताना खर्च अधिक नफा कमीच. वरुन दुष्काळाचं सावटं. थोड्याच दिवसात तो कर्जबाजारी होतो त्यातही तो आशेने द्राक्ष बाग लावतो मात्र इथेही त्याचा पदरी निराशाच येते. डोळ्यासमोर दोन मुली व पत्नी कुपोषणाच्या बळी, आलेल्या वैफल्यातून तो किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करतो. दिवाकरचा हा निर्णय व त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती याचे करुण चित्रण या कथेतून संजय गोराडे यांनी करूण शब्दात केले आहे.



' संगत' या कथेत आई, वडिल व मुलगा यांचे संस्कार, यांच्यातील संवाद व अंतर यावर भाष्य करणारी ही कथा आहे. तरुणवय तारुण्यसुलभ आकर्षकतेकडे वेधणारं आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी या वयात मुलं काहीही करायला तयार होतात. वाईट मुलांच्या संगतीत आल्यावर  बिघडतात. आई वडिलाची योग्य साथ मुलांच्या चुकीच्या निर्णयावरही मात करून योग्य वाट दाखवू शकतात हे सांगणारी ही कथा अतीशय संवेदनशील आहे.



'मोहमाया' ही कथा सत्यजीत वर्मा व यशोदा वर्मा या उद्योगपती दाम्पंत्याशी निगडीत आहे. त्यांचा  एकुलता एक मुलगा विजय. सत्यजीत वर्माचे अकस्मात अपघाती निधन होते व  आई यशोदेवर आभाळ कोसळते. मुलगा विजय वडिलांच्या संपत्तीसाठी आईशी कठोर वागतो व याच काळात राघव हा मुलगा यशोदा मॅडमच्या ऋणाचे बंध कायम जोडून आईची हाक देतो. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेची मला इथे आठवण होते. मोहात माणूस अंध होतो व निर्णय घेण्यात फसतो. आपलं कोण परकं कोण हे विसरतो हे सांगणारी ही कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते.



'बीज' दिनकरराव पत्नी  जानकी व मुलगा आदित्य यांची ही कथा. या कथेत आदित्यला पिसाळलेलं कुत्रं चावतं...व जानकीला तिच्या बहिणीची कथा आठवते आदित्यला कुत्री चावते अन् अनुषंगाने इंदुमतीची कथा आठवणे या दोन्ही घटनांची एकत्र गुंफण या कथेतून थरारक प्रसंग रेखाटताना चुकीचे निर्णय जीवघेणे ठरतात हे लेखकाने दाखवले आहे.



'लोकल' ही कथा मुंबईतील धावपळीचे जीवन जगणाऱ्या शकुंतलेची कथा, नोकरीत असताना रेल्वे रुळाखाली हाताचे दोन्ही पंजे जाताच घरी बसलेल्या कमावत्या स्त्रीची कुचंबणा व घुसमट कशी होते,  पैसे कमावत असताना जे चेहरे हसतमुख पुढे हात करायचे तेच आता नाक मुरडत, द्वेषपूर्ण नजरेने हेटाळणी करतात याचं हृद्यद्रावक वर्णन व त्याचबरोबर यात कौंटुबिक सकारात्मकतेतून ती नैराश्यावर कशी मात करते हे दाखवले आहे.



'कोन' कथेत ग्रामीण जीवनाकडे, शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, महेश या कथानायकाचा शेती करण्याचा धाडसी निर्णय. पत्नी अनघाचे या निर्णयाविरोधात पाऊल व या दोंघात समेट. हे चित्र लेखकाने मार्मिकपणे रेखाटले आहे.



 'बहुगुण'  या कथेत राधिका मोहन हे दांम्पत्य, सतीश हा मोठा मुलगा बारावर्षाचा असताना दुसरं मुल होतं व त्याच्या आगमनाने सतीशचं जग बदलतं. पहिला आवडता मुलगा नावडता होतो व तो कसा दुरावतो याचं चित्रण करतानाच योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने परत हे कुटूंब एक होते याचे अतीशय भावस्पर्शी चित्रण या कथेतून संजय गोराडे यांनी रेखाटले आहे.



अखेरीस थोडक्यात असे म्हणता येईल की जीवनातील बरे-वाईट प्रसंग, अनुभव, संघर्षात्मक घटना, योग्य- अयोग्य, चूक की बरोबर या न्यायाच्या तराजूत तोलताना या कथासंग्रहातील पात्र, प्रसंग व घटना शेवटाकडे जाताना,  कथासंग्रहातील आठही कथा 'निर्णय' या प्रकियेशी संलग्न आहेत. संजय गोराडे यांची कौंटुबिक पातळीवरची ही कथा वैश्विक अंगाने पुढे जात वास्तवादी दृष्टीकोनातून समकालावर भाष्य करत मर्यादीत अंगाने पुढे न जाता व्यापक आशयाने समोर येईल, यावर संजय गोराडे सर नक्कीच विचार करतील. कथासंग्रहाला साहित्यिक संजय सोनवणी यांची प्रस्तावना आहे. तूर्तास वाचकांचे भावविश्व समृद्ध करणारा व तहान-भूक भागवणारा हा जीवंत कथासंग्रह आहे असं म्हटलं तर यात काही वावगं नाही. संजय गोराडे यांना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा.



लेखक/पुस्तक परिचय - तनुजा ढेरे


'निर्णय' कथासंग्रह - चपराक प्रकाशन पुणे


लेखक - संजय गोराडे( नाशिक)


संपर्क-९८५०६९१२१६