भर दुपारचं ऊन माथ्यावर चटाचटा पोळणारं, अचानकच नागानं कात टाकावी अन् रंग बदलावा त्याप्रमाणं आभाळानं रंग बदलला. आभाळात काळं ढग भरून आलं अन् शिराळ पडलं. ढग गडगडू लागले, ईजा कडकडू लागल्या. जोराचं वारं वावदळ सुटलं. एकाएकी रानातला पालापाचोळा भर रस्त्यावर उधळू लागला. धुळीचे लोट उठले. पाखरं जीवाच्या आकांतानं अंग चोरून घरट्यात दडून बसली. बांधावरची झाडं, बोरी बाभळी अंगात आल्यावनी अंग झटकू लागल्या. तळ गाठलेल्या रिकाम्या विहिरीत वारा अंगात भरलेला आतल्या आत घुमू लागला. एकाएक उभ्या कुडाच्या झोपड्या भुईसपाट झाल्या. शिवरीची, बोरी-बाभळीची झाडं मुळापासून उन्मळून पडू लागली. भरदाव वारा झाडाच्या बुध्यांतून वर शिरत झाडावर शिरजोरी करू लागला अन् झाडाच्या फांद्या एकाएक शिरा तुटून दम गेल्यावनी तटतट तुटू लागल्या. पाखरं चिर्रचिर्र चिरकत झाडाच्या घरट्यातून, डोलीतून बाहेर पडू लागली.
कुणालाच काही सुचंना. रानातली माणसं झपाझप पाय उचलत गावाच्या दिशेनं निघाली. एकाएकी हंबरडा फोडलेला गाई गुरांचा, म्हसरांचा कळप एरवाळीच घराकडं परतू लागला. तोवर सांजचा वकूत झालाच. जोराच्या वाऱ्या वावदनानं ईज गेली अन् गुडूप अंधार झाला. घराघरात बायाबापड्यांची एकच गडबड उडाली. कुणाला चिमणी गवसणा, चिमणी हाय तर वातच नाही. वात आहे तर घासलेट नाही. अशी बात सांजच्या पारीच घराघरातून कंदिलाच्या वाती मंद तेवू लागल्या. बायकांनी अवकाळी पावसाचं लक्षण पाहून चुली पेटू घातल्या. वाऱ्यानं चुलीतला जाळ भडकून बाहेर पडत होता. आधीचाच उकाडा, वरून हे वारं वावदळ धूर डोळ्यांत जाणारा जीव नकोसा करत होता. अन् तितक्यात त्यो आलाच गावात सोडलेल्या, उधळलेल्या वळू सारखाच. अचानक अन् बिनबोभाट, गावातली बारकी चिल्लीपिल्ली पोरं वरडू लागली, 'आला रं आला.' अंगातली बंडी सदरा काढून भिरकावून देत, पोरं-पोरी नाचू लागली. केवड्याच्या सुगंधासारखा सुगंध एकाकी मातीला फुटला अन् उदासवाण्या भींतीच्या व्हटावर हसू फुटलं अन् एवढ्या समाधानावरच बायाबापड्या मनात स्वप्नांचा ओलावा फुटलेला, चुलीतल्या लाकडांचा धूर नाकाडोळ्यात खुपत असतानाही घरकाम उरकू लागल्या.
टप टप टपोरं गारावनी थेंब पत्र्यावर दगड टाकल्यावनी, कुत्रं घरावरून चालल्यावनी, धाडधाड पत्रं वाजू लागलं. वारं घुईघुई करत, आलं आलं म्हणता म्हणता वाट काढत गावातल्या घराघरात शिरलं, आजुबाजूच्या कच्च्या मातीच्या बांधलेल्या मुंडारी खालचं पत्र उडून जात होतं. लेकरंबाळं घरात आई- बाच्या, आज्याच्या- पंज्याच्या
पाठी दडून बसली आभाळात ईजा कडाडणाऱ्या अचानक भुईला चिरून वर गेल्यात अन् आपली भूक भागवून, कुणाचा तरी जीव गिळून मुक झाल्यागत आता जरा दमादमानं श्वास घेताना लकाकताना दिसत होत्या.
तर इकडं रानात एका वावदळातच सगळं उधवस्त झालं होतं. एकाच दणक्यात कुडावरचं पत्रं उडालं होतं. धोंडिबा अजून इकडं तिकडं धावतच होता. दोरीवर टाकलेलं फाटकं धोतरं अन् सखुची चोळी लुगडं कशीबशी त्यानं गोळा केली. अंगणात एका कोनाड्यात पडलेलं फाटकं घोंगडं अन् गोधडीची वळकटी चटदिशी उचलून त्यानं घरात येऊन मांडीखाली धरली अन् त्यो तसाच हात जोडून मेढीला टेकून बसला. तितक्यात सखुबाई आली, काखंत ईळा, खुरपं आणि डोईवर सरपणाचा भार तिनं चटाचटा पाय उचलत सरपण घरातल्या चुलीपुढं टाकलं. चुलीवर पत्र्यातून पाणी गळत होतं म्हणून तिनं चुलीवर बाजूचा पडलेला पत्र्याचा टुकडा टाकला अन् ती धोंडिबा शेजारी येऊन बसली.
शेळ्या एका कोपऱ्यात म्यॅ म्यॅ, कोंबडीची पिल्लं खुराड्यात घातलेली कुक ऽ कुक ऽ करत होती. धोंडिबा म्हणाला,
"पावसाचं आभाळ दिसताच चटाचटा पकडून आत खुराड्यात कोंबल्या तरी एक बी पिलवंड हातचं सापडलंच नाही."
सखू धोंडिबाला वरडू लागली, " एक काम धड करता येत नाही तुमास्नी. सगळं वरवरचं सदान्कदा ती तंबाखू अन् विडी ती तंबाखू चोळायचं बंद करा, एखाद्या दिसी मरसाल त्यो कॅन्सर होऊन. त्यापरीस काम तर दूरच हाय ते नीट सांभाळा. नाहीतर नुसतीच वायफट बडबड तुमची."
" अगं बरं झालं मरण आलं तर नायतर ह्यो दुष्काळ गळ्याचा घोट घ्यायला बसलायच. साऱ्या पिकाची नासाडी वरून रोगराई माणसानं जगावं की मरावं हेच कळंना ! अगं काम काय करू या मिरगाला वाट बघून बघून हात टेकलं म्या देवापुढं, गेल्या वरसला पारूचं लगीन केलं त्यापायी दोन बिगी काळीभोर जमीन ईकली, लेकीचं सणवार, जावयाचं कौडकौतीक, अन् आता तोंडावर आलेलं बाळतपण कर्जाचा डोंगूर चढाच वर चढतोय. अजून कणभरबी ऋण उतरलं नाही तोवर हा नागाच्या फण्यासारखा डूख धरून बसल्यावनी, जरा कुठं मान धरली की डसतोय ईषारी. अन् आता उरलेलं चार एकराचं रान त्यातलं दोन एकर पडिकच. दोन एकरात लावलेलं हाय ते धान बी जळून जायची लक्षणं. आंब्यानं मोहरं धरलेला जरा अशा दाखवलेली पण त्यानं बी घातच केला की सगळं सपराक."
अन् तेवढ्यात धोंडीबाला लाला म्हाताऱ्याची आठवण झाली. म्हातारा सातव्या महिन्यातच पायाळू जन्मलेला, तो घाबरंघुबरं होत म्हणाला, "सखू, अगं म्हातारं अजून माळावरून आलं नाही बघ." हे ध्यानात येताच धोंडिबाच्या पोटात एकदम खड्डाच पडला. मागच्या साली असंच या वक्ताला बाळूच्या तरण्याबांड गणूला ईजनं गिळलं व्हतं. अन् उभा गाव थरकापानं थरथरला होता. अवं मघाशी ईज कडाकडा कडाडत होती. तितक्यात टिटवीनं टिव ऽ टिवऽ टाहो फोडत घरावरनं गेली अन् सुखूचं बोलणं तोडत ती पुढं कायबाय बोलायच्या आतच धोंडिबानं वाऱ्याच्या पायानं, पायात भिंगरी बांधल्यावनी माळ गाठला. गरा गरा फिरून त्यानं वरडून वरडून अख्खा माळ डोईवर घेतला. पर म्हातारं गावलं नाही. धोंडिबाच्या तोंडचं पाणी पळालं, ईजनं गिळलेल्या बाचा देह त्याच्यासमोर उभा राहिला, एकाकी काळजात लख्ख झालं अन् तितक्यात ईज कडाडली, तसं समोर जिता बा त्याला बोरीच्या बुडाला हातात लोंखडाचा कोयता पकडून बसलेला दिसला अन् त्याच्या जीवात जीव आला. ईजच्या भ्यानं म्हाताऱ्याची दातखीळ बसली होती. तसंच त्यानं म्हाताऱ्याला पाटकुळी घेतलं अन् त्यो कुडाकडं निघाला. वाटेन भयान अंधार दाटला होता. त्याने मनोमन पांडुरंगाला हात जोडले. लयकृपा झाली रं पांडुरंगा असं म्हणत तो ती खडकाळ पाऊलवाट तुडवत चालु लागला. आजुबाजूला रातकिडं किरकिरत होतं अन् काजवं चमचमत होतं. कसंबसं उसणं अवसान आणून म्हाताऱ्यासगट कोटा गाठला. त्यानं बुड टेकलं नाय तोवर गावातल्या बायका, माणसं पळतच सटवाईच्या वरतं वरडत निघाली व्हती. धोंडिबानं बसल्या बसल्या हनम्याला ईचारलं,
" काय झालं रं ?"
अन् त्यो म्हणाला,
" या अवकाळानं गळा घोटला. ज्योतीबानं फास आवळला गळ्याभोवती. गेल्या वरसी गणूबा अन् अवंदा ज्योतीबा गेला. पुढचं काय ठावं, पुढं आपलाच नंबर असेल. पांडुरंगा तूच रे बाबा !" असं म्हणत त्यो अंथरूणावर आडवा झाला. आता वारं वावदळ शांत झालं होतं, पर आजुबाजूचा गलका मात्र वरचेवर वाढतच होता...
तनुजा ढेरे



