Showing posts with label शिवनेरीची सफर. Show all posts
Showing posts with label शिवनेरीची सफर. Show all posts

Thursday, 26 April 2018

शिवनेरीची सफर

सैर शिवनेरीची

लहानपणा पासूनच डोंगर दऱ्या भटकण्याची आवड. मला किल्ले पाहणे, ऐताहासिक स्थाळांना भेट दयायला आवडते  मुळात उंचावरची ठिकाणं आवडतात. परवा मंचर या गावी जाणं झालं. वेळ होता नंतर आमचा शिवनेरी वर जायचा प्लॅन झाला. मग गुगलमाता पहा हे पाहा ते पाहा माहिती काढा करत हो नाही हो करत आम्ही निघालो. खरंतर राजा शिवछत्रपती बद्दल असलेला आदर व प्रेम, शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी खेचत होते. त्यातल्या त्यात मुलांना माहिती व्हावी गड किल्ल्यांची हा ही एक उद्देश्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जन्मठिकाण याची माहिती व त्यांनाही या स्थळाची भेट घालून दयावी हे मनापासून वाटत होतं. आम्ही मंचर- नारायणगाव- जुन्नर यामार्ग शिवनेरी पायथ्याशी पोहचलो. मध्यवर्ती ठिकाणी रस्ता संपतो. रस्ता चांगला आहे. एका सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही निघालो. चार साडेचार वाजल्या होत्या...

ऊन उतरलं होतं. अतिशय अल्हाददायक असे वातावरण होते. ढगाळलं वातावरण.... मधेच एखादी उन्हाचा तिरपा कटाक्ष... जिवाला कासावीस करायचा.आम्ही चालू लागलो. पहिला महा दरवाजा लागला व नंतर छानशी झाडी गुलमोहराची लाल बहरलेली झाडं. कागदी फुलं फुलांच्या कमानीतून जाताना छान वाटत होते. उंचावरून दिसणारा हिरवा निसर्ग , जुन्नर व आजुबाजूची गावं, आम्ही गड चढत होते.  आकाश अन् शांभवी आठ वर्षाची मुलं भराभर चढत होती. क्षिती अन् मी मागे हे मधले सैनिक...आमची फौज चालत होती. आम्ही दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पार केला. आजुबाजूला बागबगीचे बसण्यासाठी बाकडे पिण्याचा पाण्याची सोय होती.

मधेच उंचवटा, मधेच पसरट पायऱ्या, मधेच चढ असं सगळं कुठे कुठे पाण्याचे बांधलेले हौद, वाडे, छोट्या खोल्या चढण असं पाहात पाहात चढत होतो. पण किल्ला व मुख्य जागा येतच नव्हती गड उतरणाऱ्या लोंकाना विचारलं तर ते म्हणायचे. " अजून एवढंच वर ." "अजून एवढंच वर." एक मन म्हणत होतं परत चला अन् एक मन शिवरायांचा जन्मस्थळाला भेट देण्यासाठी उत्सुक होतं. अर्धा गड चढून वर आलो होतो. काॅलेजात असताना सिंहगड झपाझप चढला होता. तो अनुभव पाठिशी होता. पण आता काय शक्य नाही असं एक मन म्हणू लागलं. खरंतर दम लागला. घाबरल्यासारखं व्हायला लागलं. कारण अंधेर पडायच्या आत खाली यायचं होतं. मग काय पटापट पटापट तरीही आम्ही चढतच होतो किल्ला.

पाचवा शिपाई दरवाजा पार करून आम्ही सहाव्या फाटक दरवाजापशी आलो. परत एक जणाला विचारलं तो म्हणाला अजून एवढंच वर आता मात्र पायात त्राणच उरला नाही. आम्ही जरासक बसलो. मुलं धपाधप धपाधप चढत व्हती. घोट दोनघोट पाणी प्यायलो. मी म्हटलं, "अहो जरासक दमानं जाऊ आनंद घेत निसर्गाचा." हे नकोच बोलत होते. मी ऐकायला तयार नव्हते मग ...मग हो नाही हो नाही करत... खाली उतरून परत जायचं तर पायही वळत नव्हते. मग आम्ही ठाम निर्णय घेतला व वरती चढाई करायचं ठरवलं. व आम्ही सातवा कुलाबकर दरवाजा पार केला. नंतर दोन मार्ग लागले एक शिवाई देवीकडे व एक जनमस्थळाकडं  आम्ही वेळे अभावी प्रथम जन्मस्थानाला भेट देण्याचं ठरवलं व त्या दिशेने चालू लागलो.

मुलांचा उत्साह कायम होता. मात्र आमची गती चालण्याची मंदावली होती. तरीही आम्ही हळूहळू गड सर केला, शिवजन्म ठिकाणाजवळ पोहचलोच. शिवजन्मस्थळाच्या ठिकाणी पोहचताच गड चढलेला सगळा शीण उतरला. थोडयावेळ त्या ठिकाणी बसून आम्ही निघालो. सूर्यास्तांची वेळ होती. आम्ही चालत थोडं पुढे आलो माझे पासष्ट -ते सत्तर वर्षाचे सासरे खाली थांबलेले पहिले, हळूहळू गड चढून वर आले होते. गुडघ्यांचा त्रास, चालताना त्रास होतो तरीही. कारण एकच शिवजन्म स्थळ पहायचं अन् जीथे शिवाजी महाराजाचा जन्म झाला. त्या ठिकाणी जाऊन शिवरायांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त करायची. 

मलं आता कंटाळली होती... आम्ही सावकाश गड उतरला या सात दरवाजाच्या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी आम्हाला तास दिड तास लागला.. व उतरायला ही आम्ही येताना सूर्यअस्ताचे काही व मग आमच्या काही स्मृतीपर भावमुद्रा टिपल्या. संध्याकाळचे सात वाजले होते. आभाळ चांदण्यांनी भरलं होतं. झाडामधून चंद्रकोर डोकावत होती. खाली आल्यावर तासभर आजोबा खाली येईपर्यंत बसलो. लिंबू, कोकम सरबत प्यायलो. थंडगार मोकळी हवा... जातना एकिकडे दिव्यानी लखलखणारे शहर मनाला सुखवत होते तर दुसरीकडे शिवाई दर्शन घ्यायचे राहिले म्हणून मनाला चुटपूट लागून राहयली. बहुतेक अजून एक फेरा होणार म्हणताच मुलं नाही नाही म्हणत हसू लागली.... अशा प्रकारे आम्ही घरी परत एकमेकांची थट्टामस्करी करत पोहचलो.

नुकताच शिवजन्म उत्सव शिवनेरी वर साजरा झाल्यामुळे की काय पण गडावर खूप सुधारणा केली आहे. फुलबागा फुललेल्या आहेत, झाडी आहे, पाणी आहे एक दिवस ट्रिप साठी छान ठिकाण फक्त संध्याकाळी चार पाच वाजता जाऊन उपयोग नाही. उन्हाच्या आधी एकतर किंवा चार वाजता गडावर असायला हवे.... खूप उशीरा गेल्यावर घाई होते. खूप मोठा परिसर आहे. फिरण्यास वेळ लागतो....एकदा तरी या गडकिल्ल्याला भेट दयावीच म्हणजे कळते की छत्रपतींच्या जन्मावेळेस हा किल्ला का निवडला असेल, जिजाऊ आईंना या किल्ल्यावर का ठेवले असेल. मावळे कसा सर करत असतील हा किल्ला हा प्रश्न  मनात डोकावतोच.

गडाला चारशे ते पाचशे एकूण पायऱ्या आहेत. काही खड्या व काही भुई सपाट व वरून तेवढंच अंतर सपाट प्रदेशाचं चालावं लागतं. गड किल्ला पाहण्यासाठी...

॥ जय भवानी जय शिवाजी ॥

सौ. तनुजा ढेरे