Thursday, 6 May 2021


अचूक शब्दांत निसर्गाचं वर्णन आणि ओघवते लेखन यामुळे 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. दमदार मांडणी, चांगले कथा बीज आणि पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीतील पात्रांच्या द्वारे लेखिकेने जे प्रेमभाव मांडले आहेत ते वाचकाच्या मनाची घालमेल वाढवितात. जयंता आणि मुक्ता यांची प्रेमकथा या कादंबरीतून उलगडत जाते. त्या दोंघाच्या मैत्रीत  सुगंधाचे येणे म्हणजे प्रेमाचा त्रिकोण होणार असे वाटत असतानाच उमेशचं आगमन कादंबरीला वेगळ्याच वाटेवर नेऊन सोडते. कादंबरीमध्ये प्रेमाची खरी खरी व्याख्याही समाजसुधारक सावंत सरांच्या माध्यमातून मांडली आहे ती आजच्या तरुणांना दिशा दर्शक आहे. आयुष्याच्या नाजूक वळणावर उभे असताना स्वप्नं पाहा, प्रेम करा पण प्रेमात उध्वस्त होवू नका. दिवसभर फिरणे, बोलणे आणि मजा करणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे सहवासातून निर्माण होणारा स्नेह आणि अशाच एका वळणार सामाजिक कार्याचे वेड लागणे म्हणजे माणुसकीचे प्रेम. सावंत सरांचा हा संदेश खूप प्रेरणादायीच आहे जो या कादंबरीतून लेखिकेने मांडला आहे. मैत्रीतून प्रेम कसे फुलत जाते याची उत्तम मांडणी लेखिकेने केली आहे. लालित्य पूर्णरित्या या कादंबरीतील प्रसंग उभे केल्यामुळे ही कादंबरी जिवंत वाटते. निसर्गाचे लोभस वर्णन मनाला सुखावतानाच अधूनमधून पेरलेल्या कवितेच्या ओळी मनाला भावतात. पुस्तकाच्या सुरवातीलाच मनोगतातून लेखिकेने वाचकाशी साधलेला संवाद हा वाचकाच्या मनाचा पकड घेतो. सुरवातीला अगदी सहज पुढे सरकणारी कादंबरी मधल्याभागात रोंमाचक बनते व शेवटाकडे जाताना ती अधिकच गूढ बनते. जयंता, मुक्ता, सुगंधा, आनंदी, आनंदा, कुसुमताई, सुमनताई, रावसाहेब ईनामदार ही पात्रं तसेच सुगंधाच्या सावत्र आईची कथा व तिचे वडील नाना या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सुगंधाचं जगणं व तिची असाहय्यता ही शेवटपर्यंत आपल्याला कादंबरी वाचायला उदयुक्त करते. एक एक कोडं उलगडत जावं तसं कादंबरी पुढे उलगडत जाते मात्र शेवट हा वाचकाच्या हातात देऊन लेखिका आपल्या मनाला आव्हान देते की शेवट हा आपल्या परीने ठरावा तो जसा तुम्ही ठरवाल तसा अर्थ त्यातून घ्या. यातच या कादंबरीचे यश आहे. अतिशय रोचक अशीही कादंबरी तुम्हाला वाचायला नक्की आवडेल.


-किरण सोनार