Sunday, 31 May 2020

हिरवी बोली बोलणारे कवी- कवी ना.धों महानोर

हिरवी बोली बोलणारे कवी :- कवीवर्य. पद्मश्री. ना.धों महानोर


जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी शुक्रवारी दिली. आणि सर्व साहित्यिक वर्तुळात पुनःश्च उत्साहपुर्ण वातावरण निर्मिती झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारी २०२० या दरम्यान उस्मानाबाद येथे होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा या आयोजक संस्थेकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झाली आहे. 'उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून ना.धों. महानोर यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल,' असे तावडे यांनी सांगितले ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची, अभिमानास्पद, स्वागताहार्य गोष्ट आहे….


कविवर्य, पद्मश्री ना.धों. महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या  औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. ना.धों महानोर यांना चार भाऊ व तीन बहिणी, ते सगळ्यात थोरले. शाळेत असल्यापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेच्या नाटकांमधूनही त्यांनी काम केले. मॅट्रीक झाल्यावर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना त्यांना त्यांच्या साहित्यिक प्राध्यापकांकडून प्रोत्साहन मिळाले. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. वैयक्तिक अडचणींमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला आपल्या गावी परतले व तेथेच रमले.


ना.धों.महानोर यांनी मराठी साहित्याचा प्रांत आपल्या लेखनीतून हिरवागार बहरवला. अद्भुत निसर्गप्रतिमांनी, प्रतिकांनी, निसर्गाच्या नानाविविध रंग छटांनी, फुलांच्या, पानाच्या, मातीच्या गंधाने नदीच्या प्रवाहासारख्या नाद लयींनी त्यांची कविता समृध्द अशी मराठी साहित्यात अमुल्य अशी भर टाकणारी ठरली. रानात शेती मातीत रमणारा हा कवी, निसर्गाची हिरवी भाषा बोलतो, हिरवी स्वप्ने पाहतो. निसर्गाशी संवाद साधतो. कवितेचं बोट धरून  आपण रसिक वाचकांना निसर्गाचं आगळंवेगळं दर्शन त्यांच्या कविता घडवतात. शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा हा  ‘शेतकवी’. ना.धो. महानोर यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. जिवावर बेतणार्‍या अनेक घटना त्यांच्या जीवनात घडल्या. अनेक कडू-गोड प्रसंगांतून त्यांना जावे लागले व तेच भाव त्यांच्या कवितेच्या गाथेतून तरलपणे उतरलेले आपल्याला दिसतात.


‘ह्या शेताने लळा लावला असा असा की

सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो

आता तर हा जीवच असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ’


ना.धों. महानोरांच्या या गोड, रसाळ शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर, आपल्या आईवर व माणसांवर जिवापाड प्रेम करणार्‍या या कवीने आपल्या शब्दांनी अवघ्या देशाला मोहिनी घातली. शेती, मातीशी, आभाळाशी संवाद साधणाऱ्या निसर्गकवितेची अद्भूत अशी विविध रूपे त्यांनी आपल्या कवितेतून शब्दबध्द केली. 


‘ या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.’


गंधगर्भ लयीने व लख्ख चांदण्याने ना.धों.महानोर यांची कविता ओंथबलेली आहे. मातीचा मृदगंध, मातीशी जोडलेलं एक अनोखं नातं, जुडलेली नाळ, मातीशी जोडलेल्या वेदना-संवेदना आहेत. आभाळाशी नातं, निसर्गाचे विविध गंध, रंग व ध्वनी असलेली त्यांची कविता, निसर्गाच्या विविध प्रारूप जाणिवांनी, संवेदनांनी फुललेला व रोमांचित करणार श्रृंगार त्यांच्या कवितेत आहे. ना. धों. महानोंरीची उत्कट अभिव्यक्ती या रोमॅटिक भाव भावनांच्या अंगाने अनेक कवितेतून वळण घेत पुढे जाते. 


‘नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे

बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे

आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना

गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना

माघातले ऊन झेलताना अंग झाले निळेभोर

पाणमळ्यातील शेलाट्या वेलींचे नव्याने उभार…’


स्वच्छंद व निखळ गावाचं वर्णन करणारी, निसर्गाइतकेच प्रेमळ प्रेमभाव जपणारी त्यांची कविता ही वेगळीच बलस्थानं घेऊन अवतरते. निसर्ग आणि स्त्री ही महानोंराच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. व याला जोडूनच निस्सिम, उत्कट, निखळ, नितळ असा पवीत्र प्रेमभाव त्यांच्या कवितेतून प्रकट होतो. त्यांच्या स्त्रीकेंद्री कविताही रानातल्या स्त्री निसर्गप्रारूपाशीच एकरूप आहेत.


‘ फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले

नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले

गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणा कुणाच्या आठवणी’


याबरोबरच केवळ निसर्गाचं सौंदर्य व सुखदायक चित्र न मांडता तितक्याच ताकदीने आत्मचिंतनातून त्यांनी दुष्काळाचे व माणसाच्या वास्तव जगण्याचे पैलूही समोर आणले. ना. धों. महानोर म्हणतात, ‘ जिथे आपण जगतो, त्या जगाशी, विश्वाशी आपण एकरूप झालेलो असतो.’ तसेच मीही इथल्या, मातीशी, निसर्गाशी, सुखदु:खाशी एकरूप झाले, व तेच शब्दचित्र त्यांच्या कवितेतून उमटलं. प्रत्येक वर्षाचा निसर्ग, आभाळ, पाऊस हा वेगवेगळी रूपे घेऊन येतो, प्रत्येक वर्षाचा भुईच्या नांगरण्याचा सुंगध हा वेगळा असतो…. कधी कधी दुष्काळ पडल्यावर माणसं निष्पर्ण होत गेलेली त्यांनी पाहिली व त्यांच्या कवितेतून तेच भाव तितक्याच ताकदीने उतरलेले आपल्याला दिसतात.


‘नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, नुसताच शुकशुकाट 

एखादेच चुकार वासरू कुठेतरी. उध्वस्त घाट

फुलांच्या पाकळ्या गळून गेलेल्या, नुस्तेच देठ

तशी माणसे नुस्ती नुस्ती त्यांच्याच खोप्यांत गुरफटलेली….’


ना.धो.महानोरांची कवितेत प्राणतत्व आहे. वास्तवतेचे सामाजिक संदर्भ आहेत. तसेच काही कवितांचा घाट हा कथात्मक असून, अल्पअक्षरत्व हाही एक गुण ना. धो महानोंराच्या कवितेचा आहे. कवितेची भाषा सहज, सोपी असून लयदार आहे.


‘ ज्वार, उभार, गर्भारपण

हिर्व्या पदराला जर,

निऱ्या चाळताना वारा

घुसमटे अंगभर.’


कविता लेखनासोबतच ना.धों. महानोंरानी गद्यलेखनही भरपूर केलं आहे. 'गाधांरी' ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह ‘ऐशी कळवळ्याची जात’ हा व्यक्तीचरित्रात्मक ललितलेखसंग्रह असे विविधरंगी ललितलेखन त्यांच्या नावावर आहे. ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’, ‘आनंदयोगी पु.लं’. या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील मोठी व्यक्तीमत्वे उलगडली आहेत. अलिकडेच त्यांचं ‘दिवेलागणीची वेळ’  हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. नवनविन साहित्यनिर्मितीतून जसा त्यांना आनंद मिळतो, तसाच शेतीमातीच्या जगण्यातून मिळतो. याचेच अनुभवकथन या पुस्तकातील लेखातून त्यांनी केले आहे. अर्थात ना.धों महानोंराचं पहिलं प्रेम कवितेवरच ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने मराठी साहित्य्त, कवितेत त्यांचं स्थान निर्माण केलं. ‘पानझड’, ‘वाहटळू’ इ. त्यांचे अकरा कवितासंग्रह व 'अजिंठा' हे खंडकाव्य प्रसिध्द आहे. 'वही' आणि 'पळसखेडची गाणी' हे त्यांच्या लोकगीतांचा संग्रह प्रसिध्द आहेत. 'जैत रे जैत' या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपात अविष्कृत झाल्या आहेत. ‘जैत रे जै’, ‘सर्जा’, ‘एक होता विदूषक’, ‘अबोली’, ‘मुक्ता’ इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. पावसाची विविध रूप त्यांच्या मनात भरलेली, ‘मृगाचा पाऊस’, ‘रात झडीचा पाऊस’इ. अनेक प्रतीमा, प्रतीकातून त्यांनी अतिशय भावगर्भ अशा पावसाळी कविता लिहिल्या व त्याची पुढे गाणी झाली. ‘घन ओथंबून येती’, ‘नभ उतरू आलं’, ‘मी रात टाकली’,’ मन चिंब पावसाळी’,  ही गाणी मराठी रसिकजनांच्या ओठी आजही कायम आहेत. ना.धों.महानोराचं लोकगीत, लोकसंगीत व लोककलेवर अपार प्रेम आहे. लोकसाहित्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. लोकसाहित्याच्या छत्रछायेतच ते लहानाचे मोठे झाले.  या लोकसाहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून काढल्या व त्या एकत्रित संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला. ना.धों. महानोंरानी लिहिलेल्या वह्या त्यांच्या 'वही' या संग्रहरूपाने पुढे आल्या.


‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा

राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा

अशा सौंदर्य व श्रृंगार रसाने नटलेल्या शब्दकळाचं लेणं लाभलेल्या 'वही' या संग्रहाचं रूप राजस आहे.

'राजसा... जवळी जरा बसा

जीव हा पिसा तुम्हाविण बा ऽ ई ऽ

कोणता करू शिणगार सांगा तरी का ऽ ही !'


विलक्षण लयकारी लाभलेल्या कविने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. 'प्रार्थना दयाघना' मुक्तछंदात आहे आणि 'तिची कहाणी' सुध्दा. महानोंराच्या कवितेचे असे अनेक विविध पैलू आहेत. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून ते प्रसिद्ध आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य झाले. भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१ कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९ साहित्य अकादमी पुरस्कार, तर इ.स. २००० - 'पानझड' या काव्यसंग्रहास तर ना.धों महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७) मधे मिळाला. तसेच मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस चालणार्‍या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. व या अनुषंगाने ना.धों.महानोर यांची संमेलन उद्घाटक म्हणून झालेली निवड व त्यांचे विचार ऐकायला मिळणं ही आपल्या साहित्य रसिकासांठी एक अद्भुत साहित्यिक मेजवाणी असणार आहे.


तनुजा ढेरे












मंतरलेली उन्हे डाॅ. रामशेट्टी शेटकार सर परिक्षण

जीवनानुभूतीच्या वास्तव बालआठवणीचा मृदगंध : मंतरलेली उन्हे

          एकविसाव्या शतकात कादंबरी, कथा, कविता आणि ललित गद्य लिहून अल्पावधीतच सुपरिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ' मंतरलेली उन्हे ' हा ललित लेखसंग्रह म्हणजे त्यांच्या बालपणीच्या, गावाकडील, आजोळच्या आठवणी आणि तेथील शेती, कृषिसंस्कृती, निसर्ग, त्यांच्या वास्तव आठवणीचा, जीवनानुभूतीचा आणि व्यक्तिचित्रणात्मक ललितबंधाचा आदर्श असा दस्तऐवजच आहे. कारण या ललितलेखसंग्रहातून त्यांनी जीवन जगत असताना पंचेद्रियांना आलेले रसरशित अनुभव आणि त्या अनुभवाच्या आठवणी ललित गद्याच्या स्वरूपात मांडल्या आहेत. हे मांडत असताना आपण गावमाती, त्या मातीतली माणसं, तेथील संस्कृती, निसर्ग आणि कृषिसंस्कृतीची जपवणूक कशी केली पाहिजे याचे आदर्श वस्तुपाठ दिलेले आहेत. म्हणूनच त्यांचा ' मंतरलेली उन्हे ' हा ललितलेखसंग्रह म्हणजे बालमनावर संस्कार करणाऱ्या अनुभवाची कधीही न संपणारी शिदोरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
                ' मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहातून तनुजा ढेरे यांनी ज्या आठवणी अभिव्यक्त केल्या आहेत, त्या सर्जनशील मनातून आविष्कृत झालेल्या आहेत. त्या आठवणींमध्ये त्यांना प्रत्ययाला येणारे सौंदर्य, जाणवणारे गंध, त्या आठवणींमधून जागे होणारे विविधांगी भावस्पर्श तरल, नितळ, स्वच्छ मनाचे भावबंध आहेत. मुक्त, आनंदी, निसर्गाच्या सान्निध्यात बहरणारं त्यांचं सहज स्वाभाविक बालपण, शाळा, तारूण्यसुलभ वृत्ती, विशिष्ट सणवार, ऋतुसौंदर्य या साऱ्यांशी निगडित आठवणींही मूळ सौंदर्यानिशी लेखनीतून उतरलेल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या या संग्रहात विशिष्ट ऋतुंशी निगडित आठवणींतील कवितांचा ऐनेमहाल दिसतो तर कधी स्वत:लाच सुचलेल्या सुंदर कवितांही ठिकठिकाणी जरी-बुट्टयासारख्या चमचमत राहतात. सौंदर्यांनुभूती देणाऱ्या त्या कविताही ललितगद्याच्या या मोकळ्याढाकळ्या प्रकृतीत सामावून जातात. म्हणूनच अशा या सौंदर्यपूर्ण शब्दांनी निसर्गचित्र जिवंत करणे ही तनुजा ढेरे यांच्या लेखनीची खासियत आहे असे माधवी कुंटे यांनी आपल्या अचूक शब्दशिल्पांनी हेरले आहे.

सदरील ललितलेखसंग्रह २४० पृष्ठांचा असून त्यात एकूण ५० लेख आहेत. त्यामधील प्रत्येक लेख स्वतंत्रपणे वाचला तर तनुजा ढेरे यांच्या वेगवेगळ्या जीवनानुभूतीचा प्रत्यय देऊन जातात, मनाला सहजच भिडतात. म्हणूनच त्यांचा हा लेखसंग्रह त्यांच्या ह्रदयस्पंदनातील, काळजाच्या ठोक्यातला मृदगंध, आठवणीचा शब्ददागिना आहे. म्हणूनच ' श्रावणातलं ऊन ' या लेखात तनुजा ढेरे काव्यमय सुरात म्हणतात की, "सरी रूपेरी उन्हात कोवळ्या धावत येती, क्षणात येवूनी वेड लावूनी निघून जाती." अशा हिरव्यागार पर्णसंभाराने नटलेल्या, कळीफुलांच्या सुगंधाने बहरलेल्या श्रावणमासाचे दिलखुलासपणे वर्णन त्यांनी केलेले आहे, यावरून त्यांची निसर्गसौंदर्याबद्यलची अभिरूची लक्षात येते. याशिवाय 'नदीकाठच्या आठवणी ' म्हणजे त्यांच्या गावच्या अक्षय आनंदाचा मनमोहक असा ठेवा आहे. कारण नदीच्या पात्रातील भर उन्हात निमुळतं होत जाणारं पाणी, त्याच्या बाजूची नाजूक हिरवळ आणि नदीच्या पात्रातील मावळतीचे विविध रंग, त्यात चमकणारे पाणी ओंजळीत पकडून मनमोकळं खेळावसं वाटावं असे दृश्य, नदीच्या रेतीतील सुंदर शंखशिंपले ही कोणाच्याही मनाला मोहित करतील असे अनुभव तनुजा ढेरे यांनी या ललितलेखसंग्रहात शब्दांकित केले आहेत.'हिरवळ' ललितलेखामधून गावाकडे, आजोळी गेल्यानंतर आई,आजी,दादा यांच्या सहवासातील श्रावणमासातली हिरवळ ,डोंगररांगाच्या टेकडीच्या अंगाखांद्यावरून हसतखेळत खाली खळखळत येणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा, नद्या, डोह, झाडं, वेली, फुलं मनात हर्षोल्हास करून जातात. तसेच पाण्यात पोहणारी बदकं,निळ्याशार पाण्यात पसरलेल्या आभाळाच्या निळ्या, जांभळ्या ,गुलाबी रंगीबेरंगी छटा आणि रानाच्या, शेताच्या,  फुलांच्या गंधानी प्रत्येक लेख सुसंपन्न झालेला आहे हे या ललितलेखसंग्रहाचे प्रभावी सामर्थ्य आहे.याचबरोबर
 'कबई' ,'मामाचा वाडा चिरेबंदी' हे लेख त्यांच्या नातेसंबंधातील आई वडील किंवा त्या वडिलांची आई, पणजी आजी, तिची आई, वडील,वडिलांची आई,मामा मामी अशा स्वतंत्र व्यक्तिचित्रणावर स्वतंत्रपणे प्रकाशझोत टाकणारे आहेत. यावरून त्यांच्या नातेसंबंधातील आपुलकी, जिव्हाळा, माया, ममतेचे आदर्शवत दर्शन घडते. म्हणूनच हा ललितलेखसंग्रह नातेसंबंध, माणुसकीचे दर्शन घडविणारा मूर्तिमंत ठेवा आहे. याशिवाय परीक्षा संपली की, सुट्टीच्या दिवसात दिवाळी सणात मामाच्या गावाला जाण्याची बालमनाची ओढ, मामाच्या चिरेबंदी वाड्यातून लिंबोणीच्या आड लपलेला चंद्र पाहण्याची उत्सुकता, कपड्या, फटाक्यांची आवड अशा दिवाळी सणावारासारख्या आठवणींही तनुजा ढेरे यांनी या ललितलेखसंग्रहातून उजागर केल्या आहेत.

'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह तनुजा ढेरे यांच्या तल्लख स्मृतीचे आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडविणारा आदर्श डोलारा आहे, कारण बालमन त्यात सहजस्फुर्ततेने उतरलेले आहे. 'बुढ्ढी के बाल' मधून आजी-आजोबाच्या सहवासात बालमनाने केलेला उनाडपणा, धांगडधिंगा, आगाऊपणा यालाही गोचर केले आहे तर 'कबई' या लेखातून खापर पणजी कबई आणि खापर पणजोबा बप्पा या मायाळू, प्रेमळ वडिलधाऱ्या माणसांचे आणि कबईने हातात दिलेला लोण्याचा गोळा प्रत्येक बालमनाला भुरळ पाडावी असे कथित केले आहे. 'येळ अमावस्या' या ललितलेखातून ग्रामीण भागातील कृषिसंस्कृतीत वेळ अमावस्येचे असलेले महत्त्व, या वेळ अमावस्यासाठी मामाच्या गावाला जाण्याची ओढ, तेथे सर्वांसोबत केलेली पांडवाची पुजा, बाजरीचे तुप टाकून केलेले उंडे, वरण, भजी, अंबील आणि रानात खाल्लेली सीताफळं, रामफळं, बोरं, डहाळे अशा आत्मा तृप्त झालेल्या बालमनाच्या स्वत:च्या जीवनातील आठवणी कोणाच्याही मनाला हेवा वाटावा अशा शब्दांत तनुजा ढेरे यांनी मोठ्या तन्मयतेने सांगितलेल्या आहेत. याचबरोबर 'कमली ' या लेखातून खाशामामीकडे भांडीकुंडी घासणाऱ्या, झाडलोट करणाऱ्या कमली या गरीब बाईचे वास्तव चित्र रेखाटलेले आहे. 'सुरपारंब्या' या लेखातून सुट्टीच्या दिवसात आजोळी गावी गेल्यानंतर चिप्पीपाणी, लगोरी, भिंगरी, गोट्या, उडाणटप्पू, खो- खो,चेंडूफळी, कबड्डी, लंगडी, झिम्माफुगडी, मैदानी खेळ, कधी पळापळीचे तर कधी अंगणातील लपाछपीचे आणि डेरेदार आंब्याच्या झाडाच्या सुरपारंब्याचा खेळ खेळण्याच्या आठवणींनांही बारकाईने तनुजा ढेरे यांनी उजाळा दिलेला आहे. यावरून गावच्या मातीत जगण्याची मजाच न्यारी असते हे सांगताना त्यांनी मुंबईसारख्या घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या माणसांच्या सहवासात, आजूबाजूच्या उंचच्या उंच इमारती, ब्लाँक सिस्टिममध्ये राहत असताना अंगण तर नाहीच पण मोकळं आभाळ, आकाशातला चंद्र आणि चांदण्या, पानांची सळसळ, चिमण्यांचा चिवचिवाट खूप कमी प्रमाणात पहायला मिळतो. ही खंतही या ललितलेखसंग्रहातून त्यांनी व्यक्त केली आहे. 'उपरणं' या लेखातून कृषिसंस्कृतीत वावरत असताना दादाला झोपण्यासाठी काळी भुई, पांघरायला फाटकं एकच उपरणं, चटणी आणि भाकर मिळते. ही समस्त शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातली दुष्काळानं ग्रासलेली कथा आणि व्यथाही ह्रदयस्पर्शी भाषाशैलीत मांडली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या जीवनात शासनाच्या विविध योजना, पतपेढ्या, सरकारी कर्ज योजनातून त्यांचे जीवन बदलले पाहिजे असे दादांचे विचार आणि त्यांचे उपरणे मायाळू मनाचा गंध व स्पर्श आहे. हे बिनदिक्कतपणे मांडलेले आहे. म्हणूनच त्यांचा 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह वास्तव जगण्याचा अचूक धांडोळा आहे.                                  

तनुजा ढेरे यांच्या गावाची कथा अजब - गजब आहे. कारण 'हळदीचं रान' या ललितलेखातून गावातील हिरवीगार हळदीची पिवळसर रानं आणि म्हणूनच हळदीचं गाव म्हणून 'हळदुगे' असे त्यांच्या गावाला नाव पडले. अशा या आपल्या हळदुगे गावाचे चित्रणही चतुराईने केले आहे. सांजवेळच्या शेतशिवारातील बदलाचेही धागे- दोरेही बारकाईने उकललेले आहेत तर 'आधण' मधून आजोळमधील आजीच्या सहवासात राहत असताना आठवणीचं आलेलं आधण मनात उकळायला लागलं की दिवसरात्रं कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही. अशा सुखद अनुभवाचे बोलही ललितबंधातून जिवंत उतरले आहेत. 'वर्लाकडचं शेत' मधून बाबांनी सांगितल्याप्रमाणे 'जरा दगडामातीची सवय राहू दे' म्हणून शेतात गेल्यानंतर दगड, मातीत आलेल्या आठवणी, विविध झाडं, फळं, आंबे याचं बहारदार वर्णन केले आहे तर 'गोष्टी वावरातल्या' लेखातून उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढायला गेलेल्या आठवणी आणि रानातल्या पाऊलवाटाचेही चित्रण केलेले आहे. याशिवाय आजीने केलेल्या वांग्याच्या भरीताची चव कशालाही येणार नाही हे कोणाच्याही तोंडाला पाणी सुटावे असे मांडले आहे. याचबरोबर आईने केलेली पुरणपोळी किंवा तुरट विलायती चिंचा, हनुमान जयंतीच्या निमित्ताने केलेली गव्हाची खीर आणि सावरगावच्या जत्रेत बैलगाडीने गेलेला अनुभव, तेथे खरेदी केलेल्या वस्तू यांच्याही बालआठवणी अतिशय ताजेपणाने शब्दबद्ध केल्या आहेत. म्हणूनच तनुजा ढेरे यांचा 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह अस्सल जगण्याचा गंध, सुगंधही आहे.

                    'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ' या उक्तिप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात बालमनाच्या अनुभवाचे ठसे  कायमस्वरूपी जिवंत असतात. म्हणूनच 'ओढ पंढरीची' या लेखातून आषाढी, कार्तिकेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रक्मिणीची मनोभावे दर्शन घेण्यासाठी मनामध्ये असलेली आई - बाबांची ओढ, त्यांच्या सहवासात फिरलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटातील गोड भक्तिभाव, कीर्तन, भजनात रमलेले वारकरी, दिंड्या, टाळ, मृदंगात रमलेली मनंही तनुजा ढेरे यांनी वस्तुनिष्ठपणे अधोरेखित केलेली आहेत. 'धोंडं दान' मधून धोंड्याच्या महिन्यात गणूच्या बायकोनी म्हणजे गंगूनी केलेले धोंड्याचे जेवण, त्याची खाण्याची चव याचेही दिलखुलासपणे चित्रण केले आहे. 'कोजागीरी' ललितलेखामधून हळदुगे गावातील धार्मिक जीवनाचे, देव- धर्म, देवी आणि कोजागीरीचे वर्णन केले आहे तर 'चांदणं' मधून आषाढ, शरद, हेमंत, वैशाख अशा विविध ऋतुंत आपल्या आवडत्या व्यक्तिंबरोबर टिपूर चांदणे मोजत बसावे असे मनमोहक चित्रण केले आहे. 'ओठावरचा पाऊस', 'ढगाची कौल' ,'धुकं',' सुगंधी गारवा' ,'कहाणी त्याची अन् माझी', 'पावसाचे टपोर थेंब 'अशा विविधांगी ललितबंधातून पावसाची रूपे त्यांच्याशी निगडित कविता, त्यांच्या प्रतिमा यांची सुंदर मांडणी केलेली आहे, गुलमोहरावर असलेले त्यांचे प्रेमही अभिव्यक्त केले आहे. चिरेबंदी आठखणी वाड्यात राहत असताना नातेसंबंधातली सर्व माणसं आणि शेवरी, शेवगा आणि पारिजातकाच्या झाडाचे सुंगध या आठवणींनाही तनुजा ढेरे यांनी सांक्षाकित केले आहे. तर ' अंगणातलं ऊन ' मधून सकाळचं अंगणातलं कोवळं ऊन आणि मैत्रिणींना असलेली गुलबाक्षी फुलांची आवड ह्या आठवणी कशा मनात तग धरून राहिल्यात, त्या मनमोकळेपणाने अभिव्यक्त केलेल्या आहेत. 'मनपाऊल', 'तुझ्यासाठी दोन शब्द' या ललितलेखामधून बालमनातील दोन शब्दाची अजोड अशी गुंफण घातलेली आहे. 'रंगपंचमी' खेळलेल्या रंगबावऱ्या आठवणींनांही साकारल्या आहेत. कोवळ्या वयातला पाऊस आणि उन्हाचे कोवळे कवडसे वर्णन करण्याबरोबर घरातील कडक शिस्त, करावयाचा शाळेचा अभ्यास, श्यामची आई अशा पुस्तकांचे करावयाचे वाचन, शाळेत शिकत असतानाचे अनुभव या आठवणींनाही ललितलेखसंग्रहातून अतिशय तळमळीने तनुजा ढेरे यांनी मांडले आहे. 'सांजनिळाई' या लेखातून प्रिय जमू, बाबी या मैत्रिणींना पत्रात्मक स्वरूपात सांगितलेल्या आठवणी या ललितबंधाचे ठळक वैशिष्टये आहे, त्याचे ते प्रभावी सामर्थ्य आहे.

                ' मंतरलेली उन्हे ' या ललितबंधातून खेड्यातील गावाकडच्या आठवणींबरोबर पुणे, मुंबई, ठाणे शहराच्या संस्कृतीचे फरकही अचूक टिपले आहेत. म्हणूनच ' कोलाज आठवणीचा ' मधून पुण्यात आई- बाबासोबत राहायला आल्यानंतर एस.पी.काँलेजमध्ये घेतलेला प्रवेश, पर्वती, शनिवारवाडा, संभाजी पार्क, झेड ब्रिज, लक्ष्मी मार्केट, तुळशीबाग, हाँगकाँग लेन या ठिकाणाशी जुळलेल्या पुणे शहराच्या हिरव्यागार लोभसवाण्या निसर्गाच्या प्रिय आठवणींही तनुजा ढेरे यांनी या ललितलेखातून आपल्या शब्दशिल्पांनी कोरल्या आहेत तर निसर्गात होणारे बदल, होणारी पानगळ, फुटलेला भादवा, वसंत ऋतुत नटलेले निसर्गसौंदर्य, चैत्रमोहर हा लेख कोणाच्याही मनाला मोहित करील असाच आहे. प्रवासात आलेल्या निसर्गरम्य आठवणी, रस्ते, झाडेझुडपे, इमारती, सांजवेळचा रेल्वे, बस वा बैलगाडीतून केलेला प्रवासही आनंदाची पर्वणीच असते. तसेच वसंतातील काँपर पौडची फुलं,आभाळ भरून आलं की, निसर्गात झालेला विविधांगी बदल, झाडेझुडपे, हजारी मोगरा, राघू -पोपटाचं असलेलं वेड, अंगणातले विविध पक्षी, मांजरासारखे प्राणी, चिमणी, खारूताई असा पक्षांचा चिवचिवाट, पानांचा सळसळाट अशा निसर्ग सौंदर्याच्या शब्दश्रुखंलाची खाण म्हणजेच तनुजा ढेरे यांचा 
'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह होय.
            
मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून त्यातून खेड्यातील निसर्गसौंदर्यांचे सूचन होते तर मलपृष्ठावरील अभिप्रायातून माधवी कुंटे यांनी हा ललितबंध गावखेडे, आजोळच्या आठवणींचा जबरदस्त असा दस्तऐवजच आहे, अशी पाठराखण केलेली आहे. श्याम पेंढारी यांनी ज्या निसर्गरम्य परिसरात तनुजा ढेरे ह्या लहानाच्या मोठ्या झाल्यात आणि लग्न होऊन सासरी आल्या, त्याही मुंबई शहराला खेटून असलेल्या, निसर्गाची पर्वणी लाभलेल्या ठाणे शहरात, अशा 'श्रीमंत मनातली चैत्रपालवी' असा या लेखसंग्रहाला दुजोरा दिला आहे तर भावस्पंदनमधून
 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह सहजपणे लिहिण्याच्या ओघातून, बालआठवणीतून कसा साकार झाला हे निसंदिग्धपणे सांगितलेले आहे. त्यांनी हा ललितलेखसंग्रह कुटुंबातील प्रिय व्यक्ती आणि आजोळच्या उतरंडीनी, कणगींनी व ऋतुरंगानी त्यांचं जीवन समृद्ध केलं म्हणूनच हे अनुभवाचं व अक्षराचं लेणं त्यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आहे. याशिवाय या ललितलेखसंग्रहाच्या कित्येक लेखाच्या शेवटी आशयानुरूप विविध छायाचित्रं दिलेली आहेत, म्हणूनच या ललितबंधातील आशयाला अतिशय दमदारपणा आलेला आहे.

 'मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहातून गावचे सण, वार, उत्सव, प्रथा ,परंपरा याचे वास्तव चित्रण आले आहे असून त्याला पुराणकथांचीही झालर लाभलेली आहे .हे सारं निसर्गस्नेही सुंदर जीवन मुंबई नजिकच्या ठाणे शहरात राहत असलेल्या तनुजा ढेरे लेखिकेला आठवतं, तेव्हाच्या त्यांच्या भावना अस्सलपणे कित्येक लेखातून सहजस्फुर्त अभिव्यक्त झालेल्या आहेत, हे या ललितलेखसंग्रहाचे सर्वात महत्त्वाचे ठळक वैशिष्टये आहे. गावमातीतील लोकसंस्कृतीची झालरही त्यांच्या आठवणीतून मूर्तिमंत साकार झालेली आहे. याचबरोबर ग्रामीण जीवन, तेथील माणसं, वाडेवस्ती, शेतीमाती, फुलं, निसर्ग, नद्या, डोंगर, सणवार, रीतिभाती, शाळा, शिक्षण, खेळ, पशूपक्षी अशा पंचेद्रियांना आलेल्या जीवनानुभूतीच्या वास्तव बालआठवणीचा सर्वांना उपयुक्त असा मृदगंध म्हणजेच तनुजा ढेरे यांचा
 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह होय. त्यांच्याकडून असेच सर्जनशील लेखन व्हावे म्हणून त्यांना आभाळभर शुभेच्छा या ललितलेखसंग्रहाचे सर्वचजन स्वागत करतील या अपेक्षेसह….


डॉ.रामशेट्टी शेटकार मराठी विभाग 
दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर
भ्रमणभाष् : 9922191805
ईमेल : ramshetkar011@gmail.com


मंतरलेली उन्हे - ललित-लेखसंग्रह
लेखक : तनुजा ढेरे 
मुखपृष्ठ : सतीश भावसार 
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन,मुंबई 
पृष्ठ : 240
किंमत : 275

उमेश मोहिते - फुलवा कथासंग्रह परिचय दैं.लोकमत- सोलापूर

*गाव-खेड्यातील स्त्रीची कथा : '* *फुलवा '* 
  
कविता, कादंबरी, कथा आणि ललितलेखिका म्हणून अल्पावधीतच सुपरिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ' फुलवा ' हा कथासंग्रह पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला असून संग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या सर्व कथा गाव-खेड्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या असून तेथील कष्टकरी गरीब जनसमूहाच्या जगण्याचे भीषण आणि भयावह वास्तव चित्रित करणाऱ्या आहेत.

 ' जनाक्का ' या पहिल्या कथेत जनाक्का नांवाच्या कष्टकरी स्त्रीच्या आयुष्याची कर्मकहाणी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून चार मुलींची आई असलेल्या जनाक्काला पोट भरण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. चंद्री नांवाची तिची मुलगी गावातल्या नामा दुकानदाराच्या वासनेची शिकार होते, तर दुसरी पेटवून घेऊन मरते. तिसरीला घटस्फोट मिळतो. थोडक्यात मुलाच्या हव्यासापोटी तिच्या व तिच्या चारही मुलींच्या आयुष्यांची कशी धुळधाण होते, हे लेखिकेने या कथेत रंगवले असून ही कथा मन सुन्न करुन टाकते. गावातील बचत गटाच्या स्त्रियांच्या बळावर गरीब घरातील निरक्षर असलेली ईनी कशी सरपंच होते, याचे वास्तव आणि नेमके चित्रण 'इलेक्शन' कथेत असून ही कथा गावपातळीवरील राजकारणावर प्रकाश झोत टाकते आणि ग्रामीण स्त्रियांना आलेल्या आत्मभानाचे सूचनही करते. ग्रामीण परिसरात नात्यात सोयरसंबंध सर्रास केले जातात, पण कधी - कधी असे सोयरसंबंध कसे क्लेशदायक व दुःखाचे ठरतात, याचे वास्तवदर्शी रेखाटन  ' सोयरीक ' कथेत असून या कथेच्या नायकाची ; कोडिंबाची, बहिणीकडून होणारी दमछाक नेमकेपणाने उजागर झाली आहे. गरीब आणि निरागस अशा आंधळ्या चंपाच्या आयुष्याची झालेली वाताहत ' आंधळी ' कथेत उमटली असून तिचे दुर्दैव वाचून तिच्याविषयी मनात कणव उत्पन्न होते, तर ' बोरमाळ ' ही कथा मान -पानाच्या मोहातून जावयाकडून सासऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक कथन करते आणि त्याचवेळी बापाच्या घराची झालेली पडझड पाहून मनुताई बंड करुन उठते आणि नवऱ्याच्या आवाजवी मानपानाला विरोध करते. पर्यायाने नवरा तिला सोडून जातो आणि मनुताई माहेरी एकटी राहते. असे कथानक असलेल्या या कथेतील बंडखोर मनूताई मनात ठसते आणि लढण्याची प्रेरणाही देते. पतीनिधनानंतर शहरात अॅटो चालवून उदरनिर्वाह करणारी रुक्मिण तारुण्यसुलभ भावनेतून मवाली असणाऱ्या समशेरच्या नादी लागते आणि स्वतःचे दुर्दैव कसे ओढवून घेते, याचे नेमके चित्रण ' रूक्मिण ' कथेत येते. 

' फुलवा ' ही शीर्षकथा काहिशी दीर्घ असून या कथेत अर्धनागर वातावरण आहे. खेड्यात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तालुक्याच्या गावी महाविद्यालयीन शिक्षणासाठी फुलवा येते आणि विविध स्पर्धामध्ये भाग घेते. लेखनही करु लागते. महाविद्यालयातील कादंबरीकार प्रा.दिवटे यांचे तिच्याकडे लक्ष जाते आणि ते तिला मोहपाशात अडकवू बघतात. निरागस मनाची फुलवा त्यांच्या मोहजालात अडकते आणि स्वतःचा नाश ओढवून घेते.अशी ही चटका लावणारी कथा विचार करायला भाग पाडते. तसेच वर्तमानकालिन शिक्षण क्षेत्रातील ' भ्रष्ट ' आचारावर उजेडही टाकते. शेतमजूराची लेक असलेल्या तानीच्या शिक्षणाकरीता चाललेल्या धडपडीची करुण कहाणी ' तानी ' कथेत आहे, तर ' भोग ' ही कथा पत्नी वारल्यानंतर, दोन मुलं असूनही खऱ्या अर्थाने निराधार झालेल्या दगडूआप्पाची जीवघेणी होरपळ मांडणारी आहे. गावातील रमू पोट भरण्यासाठी मुंबईच्या मोहमयी दुनियेत आल्यावर कसा सर्वार्थाने संपून जातो, याचे मार्मिक चित्रण ' पोहरा ' कथेत आले आहे. येरमळा येथील येडेश्वरीच्या जत्रेतील गर्दीत हरवल्याच्या प्रसंगावर आधारीत ' साळुबाई ' या कथेत तेथील जत्रेचं हुबेहुब वर्णन असून ' तो ' जत्रेत हरवल्याचा अनुभव या कथेतून लेखिकेने साक्षात उभा केला आहे. शेतातल्या घराजवळच्या वेड्या बाभळीच्या बनात आलेल्या बालपणीच्या विलक्षण अनुभवावर आधारित ' येडया बाभळीचं रान ' ही कथा लेखिकेने छान गुंफली आहे, तर आवडत्या आजोबांचे शब्दचित्र ' चंची ' कथेत रेखाटले आहे.

थोडक्यात ' फुलवा ' कथासंग्रहातील तनुजा ढेरेंची कथा गाव - खेड्यातील कष्टकरी शेतमजूर स्त्रियांच्या जगण्याचा संघर्ष अधोरेखित करणारी असून या स्त्रिया असहाय, अगतिक, सोशिक असून वाटयाला आलेले जिणे निमूटपणे जगणाऱ्या आहेत. (अपवाद ' बोरमाळ ' कथेतील मनुताई ) म्हणजेच त्या निरक्षर,परंपराप्रिय व परिस्थिती शरण आहेत.पण असे असले तरी त्यांची जगण्यावर विलक्षण माया आहे आणि जीवन जगण्यासाठी असते, असा संदेश ही कथा देते ' हे विशेष ! नेटके संवाद,चित्रमय शैली आणि माफक निवेदन आदींमुळे ग्रामीण परिसर रंग - रुपासह आविष्कृत होतो आणि ही कथा स्पर्शून जाते. ठसठशीत पात्रचित्रणामुळे मातीचा गंध लाभलेल्या जनाक्का, फुलवा, तानी, साळुबाई या कथानायिका मनात रेंगाळतात आणि विचार करायलाही प्रवृत्त करतात. मराठवाडी बेालीचा वापर कथेच्या सौंदर्यात भर घालणारा असून ' बक्कळ ' , ' खळगूट ' , ' कोरड्यास ' , ' शेरडं ' , ' जवा ' , ' निरशा ' , ' परवर ' सारखे मराठवाडी बोलीभाषेतील शब्द वाचनानंद देतात. असे असले तरी दोन - तीन उणिवा नोंदवणे भाग आहे.' मुंगळे मास्तर ' ही विनोदी कथा असून संग्रहातील तिचा समावेश खटकतो, तर ' वडा ' आणि ' मन वढाय वढाय ' या कथा नसून ललितलेख आहेत. शिवाय कांही कथांच्या शेवटी येणारी भाष्ये टाळायला हवी होती. उदा.' चांगल्या वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात '. ( कथा : भोग ) किंवा ' माणसं माणसातलं माणूसपण हरवून बसू लागली आहेत, ही काळाची शोकांतिका बनत चालली आहे '. ( कथा : चंची ) असो. असे असले तरीही ' फुलवा ' तील कथा गाव - खेड्यातील कष्टकरी स्त्रियांचे कष्टप्रद जगणे उजागर करणारी असून मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले म्हणतात त्याप्रमाणे 'असहायता, विवशता, अगतिकता अन् सोशिकता यांच्या दिशाहीन वादळात सापडलेल्या माणसांचे आश्वासक चित्रण करणारी ही कथा आहे ' हे नक्की ! हेच लेखिका तनुजा ढेरे यांचे यश आहे; म्हणून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन  ! 
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

 *फुलवा*        -  ( *कथासंग्रह )* 
लेखिका      -  *तनुजा ढेरे* 
प्रकाशक     -  *दिलीपराज प्रकाशन , पुणे .* 
पृष्ठे            -  १६६
मूल्य.         -  २४० रु .
मुखपृष्ठ      -  संतोष घोंगडे

.........     ........     ........     ......    .......

परीक्षण :*उमेश मोहिते,* 
चलभाष : ९४०५०७२१५४

ऋतुमितवा काव्यसंग्रह - तनुजा ढेरे


ऋतुमितवा - ऋतुंचा सोहळाच जणु, प्रेम आणि ऋतु यांचं अनोखं दर्शन तसेच ऋतुचं हळवंपण आणि ऋतु हाच मितवा ऋतु हाच मित्र व सखा या भावनेतून ऋतुंचे अनोखे पदर उलगडणारा हा कवितासंग्रह 'ऋतुमितवा' तनुजा ढेरे.

फुलवा कथासंग्रह - तनुजा ढेरे - दिलीपराज प्रकाशन पुणे - जानेवारी 2020


डिंपल प्रकाशन प्रकाशित - मंतरलेली उन्हे - ललितलेखसंग्रह


‘ मंतरलेली उन्हे ’ हा तनुजा ढेरे यांचा लेखसंग्रह वाचकाला त्या लेखांसह त्यांच्या बालपणाच्या गांवी, आजोळगावी, तिथल्या शेतीमातीत, निसर्गात झाडाफुलांमधे, वाड्यावस्त्यांमधे फिरवून आणतो. तिथलं ऋतुसौंदर्य, सणसमारंभ, तिथली माणसं वाचकाला त्या आठवणींमधे गुंतवून ठेवतात. मुक्त आनंदी निसर्गाच्या सानिध्यात बहरणारं सहज स्वाभाविक बालपण,  तारूण्यसुलभ वृत्ती या साऱ्याशी निगडीत आठवणींही मूळ सौंदर्यानिशी लेखनीतून उतरतात. कवयित्रिही असलेल्या या लेखिकेच्या सौंदर्यानुभूती देणाऱ्या सुंदर कविताही जागोजागी चमचमत राहतात व ललितगद्याच्या या मोकळ्या ढाकळ्या प्रकृतीत सहज सामावून जातात.अतिशय देखणी निसर्गचित्रे व ठसठसशीत व्यक्तिचित्रे शब्दांनी जिवंत चित्रीत करणं ही लेखिकेची खासियत आहे. लेखिकेच्या अंगी जे सृजन सामर्थ्य आहे त्याचा अविष्कार या सुंदर ललित गद्यलेखनात झालेला आढळतो. 


                                          माधवी कुंटे

ऋतुमितवा काव्यसंग्रह - तनुजा ढेरे लेख - लेखक माधव गरड समीक्षण


तनुजा ढेरे यांची कविता 'आठवांची उसवण'

मनातल्या मौनाला मनातच भांडावं आणि त्याचं गाणं व्हावं. आतल्या नितळ तळावर काही चित्रं तरलतेनं सांडतात आणि ती चित्र पुन्हा पाहता येणं आतल्या रंगासह हे काम कविता करते. 'ऋतुमितवा' हा तनुजा ढेरे यांचा कवितासंग्रह हाती आला आणि एक तरल भावमय अशा चित्रांचा गुच्छ गवसल्याचा अनुभव आला. जी खळबळ कलावंताच्या मनात असते ती खळबळ तिच्या लाटासह, गाजेसह अलगद सामोरी ठेवणं कलावंताचं कसब असतं. या कवितेच्या प्रांतात विहारायला घेतांना अलगद चालायला घ्यावं लागतं. पाना- फुलांना धक्का न लागू देता त्यावरील दवबिंदू अलगद प्राशावे लागतात आणि दवातल्या इंद्रधनुला आत आत साठवता यावं लागतं. रसिकाला असे रंग-गंधाच्या साऱ्या छटा त्यांच्या पदरात सांडण्याचं, बहाल करण्याचं काम तनुजा ढेरे करतात. कलावंताला दिसतं काय ? तो पहातो काय ? आणि दाखवतो काय ? वास्तव दिसण्याला त्याच्या दृष्टीतून तो पहातो आणि त्यानं पाहिलेलं अनोखं लावण्य, सुख दुःख किंबहुना त्याचं आनंदविभोर होणं शब्दबध्द करणं म्हणजे कलावंत असणं. 

मनातल्या कवितेला तसं काय लागतं, कुणासाठी तरी थोडं झुरावं, मरावं लागतं. आभाळ कवेत घ्यावं लागतं. मग मनाच्या भरलेल्या घड्यात सूर्य उतरतो. त्या सूर्याला दिवा दाखवत अनवाणी फिरावं लागतं. 'ऋतुमितवा' मधील कवित ऋतुचं बहरणं, उमलणं, गवसणं आणि सांडणं मांडतात.  आणि या साऱ्या  स्वतःच्या प्रतिक-प्रतिमामधून लिलया व्यक्त होता आलं की कलाकृती एका उंचीवर जाते. ती आठवात दमते. मंत्रमुग्धशी मग स्वतःशीच बोलते.

'तुझी भेट झाली तेव्हा
श्रावण हिरवा होता
ऊन पावसाचा खेळ
पानात रंगला होता (पृष्ठ १५)

हे डब्ब होणं. अप्रतिमपणे उभं राहतं तेव्हा आपण या अनुभवाशी एकमग्न होतो. एक आर्त गाणं आतमध्ये झरायला होतं. काही निसटून गेलेलं-हुलकावणी देवून गेलेलं असं काळीज तळातून ढवळून सामोरं येतं. आठव, सय बिलगून आहे. ती आठवण करताच येत नसण्याची ही गोष्टयः

'हा शुभ्र निळा पाऊस
हा मंद ढगांचा वारा
उरी झेलती...   राने
या सरी फुलांच्या धारा' (पृष्ठ १८) 

मनाच्या अवखळतेला बांध घालायचा तरी कसा ? इथल्या या निळ्या पावसाचं वेड अंगोपांगी भिणलेलं आणि अंगणानं पावसाला आवतण दिलेलं. भिजावं. इथं भिजणं टाळताच येणारं नसतं. हे भिजणं नाकारणं म्हणजे जीवनाला विन्मुख होणं. ही कविता जीवन सन्मुख बनवते हे तिचं बळ आहे. निसर्गाला घेवून, निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गातील प्रतिकातून ही कविता हळवे हुळहुळते कोपरे खोलायला घेते. पाखरं निजली, रानवाटा अंधारल्या तरीही सख्याचा पत्ता नाही. रात सारी त्यांच्या येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून आहे. दिशा विसावणाऱ्या तरीही त्याचं येणं नाही. ही कविता अशी निसर्गाला सोबत घेवून त्यात नहात उभी रहाते आणि सख्याचा आठव कातर कातर सायंकाळीही करत रहाते. तिथं भेटलो ते क्षण आठवायला येतात आणि मग

'तुझ्या हसण्याचे थवे
डोळा पावसाची झड'

आतलं दुःखही संयतपणे मांडलं जावं तेही इतक्या ताकदीनं. कविता आपला घाट असा सांभाळते आणि मध्याभोवती कड करून एक बंदीश आपल्या पदरात ठेवते. अनुभवाशी थेट होतांना तो अनुभव आपल्यापर्यंत  थेटपणे पोहचवण्याचं कसब कवयत्रि तनुजा ढेरे यांच्याकडे निश्चित आहे. कवी मुळातच जगावेगळं पहातो. जगावेगळं रहातो आणि जगावेगळं जगतो. तेव्हा पारापारावर दुःख पाहिल्याची चर्चा चालते तेव्हा हा अंधारात दिवा घेऊन बसलेला असतो. ' आलो उजळावया वाटा.' वाटा निर्माण करायच्या आणि त्या लख्ख ठेवायच्या हे काम कवी अहर्निश करतो. कविला जे घावतं, गवसतं ते लयबध्द भाषेच्या आधारे मांडतो. तो व्याकरण मोडत नाही आणि मांडतही नाही. आहे त्या शब्दातून गवसलेलं मांडताना तो नेहमी प्रतिमा, प्रतिकातून बोलतो. त्याचा प्रत्येक शब्द जुना असला तरीही नव्याने अर्थ बहाल करणारा असतो. अर्थाची असंख्य वलये तो आपल्यापर्यंत पोहचवतो. कविचं व्यक्तीमत्व, चरित्र कविच्या कवितेतून शोधणाऱ्या हुलकावणी देतो. निर्मितीच्या प्रदेशात तो निर्माता मग त्याला कुठलीच बंधनं असत नाहीत. मग अशी अफलातून काळीजतळातील कविता बाहेर येते.

इतकी अप्रतिम कविता झरते. कविता करता येत नसते. ती असते. तिला शोधावं लागतं. ती अपसूक घावते. तिला बांधावं लागतं. बऱ्याच कविता स्वप्नात रंगणाऱ्या, स्वप्नात दंगणाऱ्या आहेत. या कविता म्हणजे आठवातल्या झऱ्याची गोड कहाणी आहे. तो झरा खळाळता ठेवण्याचं कसब कवयित्रीचं अलवार, तरल भाषा आणि लयबध्द, तालबध्द असं शब्दाचं नर्तन आपल्या मनात रुंजी घालायला लावतं तेव्हा आपण मंत्रमुग्ध होतो.

या कविता म्हणजे कवयित्रीने चितारलेली निसर्गाची तरल तालमयी चित्रलिपी आहे. बहुतांश कविता या आठवावर आधारीत हळव्या भावातून आलेल्या आहेत. म्हणून त्याला काही मर्यादा आहेत. सौंद्याभिरुची आणि हळवे कातर प्रेम याची सरमिसळ या कवितात दिसून येते. या कविता स्वतःची लय सांभाळताना गीताच्या बाजाला सोबतीला घेतात. छंदोबध्द रचना हा कवयित्रीचा आवडता प्रांत. जे वास्तव आहे लौकिक आहे, सत्य आहे त्या सत्याला भास अभासाच्या हिंदोल्यावर बसवून कवयित्री, कविता झुलायला लागते हे या कवितेचे यश आहे. तरीही काही वेगळ्या कविता ज्या  दु:खाचं आर्त गीत आहेत. आतडं पिळवटून टाकणारं दुःख तळातून उसवून येतं तेव्हा या अनुभवाने आपण सुन्न होतो. खरंतर मुक्तछंदातून ही कविता चांगली उलगडते पण एकदोन कविता वगळता मुक्तछंद नाहीच.

कितीदातरी मोड घालावा लागतो भावनांना
मुडपून ठेवावी लागतात वहिची पाने
लिहिता लिहिता पेनाच्या  टोकावर
आलेल्या शब्दांना,
घालावा लागतो लगाम....' ( पृष्ठ १२७ )

ही अत्यंत ताकदीची रचना सामोरी येते. निळी पहाट, निळा पाऊस या प्रतिमा वारंवार येतात. ही पुनरूक्ती टाळायला हवी होती. बऱ्याच कवितेत पुनरूक्ती आलीच आणि सर्व कवितेत रोमँटीझम वसलेला आहे. या मर्यादा असल्या तरी सर्व मर्यादा लंघून ही कविता आणि कवयित्री तनुजा ढेरे यशस्वी झाली आहे तिचं स्वागत करुया.

कवी.लेखक - माधव गरड
कवितासंग्रह - 'ऋतुमितवा'
पृष्ठसंख्या- १२८, किंमत / १५०
कवयित्री- तनुजा ढेरे
डिंम्पल पब्लिकेशन, वसई

आईचा पदर मराठी- मराठी दिनानिमित्त लेख.