Friday, 31 July 2020

पुस्तक परिचय दोरखंड ग. पि. मनूरकर


दोरखंड :- पाचवीला पुजलेल्या दुष्काळाची गाथा.


‘दोरखंड’ या कथासंग्रहातील ग.पि.मनूरकर यांची कथाशैली अतीशय संवेदनशील आहे. या संग्रहात एकूण बारा कथा आहेत आणि या बारा कथा ' शेतकऱ्यांच्या नशिबी बारमाही पुजलेल्या दुष्काळाची गाथाच आहे' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेती हेच रोजंदारीचं साधन. शेती हीच माय-बाप. हिच्या फुलण्यावरच शेतकऱ्याची सारी भिस्त असते.  ग्रामीण  भागातील कुटुंब, तेथील वातावरण तेथील बोलीभाषा याचे अस्सल चित्रण या कथातून दिसते. ग्रामीण कुटुंबातील शेतकरी प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळाने बारमाही ग्रस्त असतो. यांच्या गळ्यात दुष्काळाचा फास कायमस्वरुपी असतोच. कधी कधी मृगाच्या एकदोन सरींनी हा फास सैल होतो तर कधी कधी दोनतीन वर्षाच्या सलग दुष्काळानं हा विळखा अधिकच घट्ट होतो व हा फास शेतकऱ्याचा जीव घेतो. या कथासंग्रहातील कथामधून दुष्काळाचे भीषण चित्र लेखकाने उभे केले आहे व ते वास्तव आहे. कारण या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत. कर्जाचा बोजा, कौटुंबीक हेळसांड यामुळे कर्जांचा कालसर्प कधी जीवाचा घोट घेईल व सामान्य माणूस हतबल, जीवावर उदार होऊन जीव देईल हे कोणीच सांगू शकत नाही. आज माणूस आहे तर उद्या नाही असं भयान चित्र ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याच्या नशिबी तो उद्याच्या आशेवर आजचा दिवस ढकलत असतो. आणि तीही आशा सुटली तर मग तो मागचापुढचा विचार न करता मुत्यृचा मार्ग स्विकारतो. यात आपल्या कुटूंबातील आपल्या घराचा प्रमुख आधार गमावल्याचं दु:ख एकिकडे तर दुसरीकडे आर्थीक अडचण यात झालेली वाताहात होत्याचं नव्हतं झालेलं. माणूस नव्याने उभा राहयला पाहतो... पण माणूस गमावल्याचं दुःख पैसा भरून काढू शकत नाही न् पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. पोटात दोन घास ढकलण्यासाठी, जगण्यासाठी त्याला काम करावंच लागतं. मेलेला मरतो पण जीवंत असणाऱ्याच्या माथी मरणाचं भयाण दुःख सोडून जातो. पुढे उभा काळच त्याला जगायला शिकवतो.

कधी कधी  मुत्यृच्या विळख्यात अडकलेला शेतकरी,  नैराश्यात पूर्णपणे उध्वस्त होतो. कठीण प्रसंगात त्याला कोणीच साथ देत नाही. आपली माणसं देखील फसवतात, दारात उभी करत नाहीत. तर कधी कधी आपली म्हणून जीव लावणारी माणसं जीवावर उठलेली माणसं सोबत असूनही ओळख  दाखवत नाहीत. तर दुसरीकडे जीवाभावाची,  भावकी नसतानाही कठीण प्रसंगात माणुसकीला जागणारी, जीवाला जीव देणारी माणसं भेटतात, असतात, पाठीशी उभी राहतात. याचं जीवंत उदाहरण देणाऱ्या  कथा या संग्रहात आहेत. जीवाला चटका लावणाऱ्या, या कथा यातील संवाद, घटना, प्रसंग हे अतीशय बोलके व काळीज हेलावून टाकणारे आहेत. ‘दोरखंड’ या कथासंग्रहाच्या शीर्षकातच कथासंग्रहाचा आशय व विषय स्पष्ट होतो. आणि त्या शीर्षकाला या कथासंग्रहातील प्रत्येक कथेने न्याय दिला आहे.

'बेपत्ता' या कथेत जानूचा बा लहान असतानाच गळफास लावून घेतो. जानूची आई तानी त्याला सांभाळते मोठं करते मात्र तो या दुष्काळाला कंटाळून शेती विकून आपल्या आईला तिथेच ठेवून बायको-मुलांना घेऊन शहरात राहयला जातो. तानी उपाशीपोटी तशीच मरून जाते.  जाताना जानू जानू करत तडफडून मरते मात्र तो परत येत नाही. मात्र जेव्हा तो परत येतो तेव्हा आई मेलेली असते असे विदारक दुःख लेखकाने अगदी सहज, ओघवत्या भाषेत करताना काळीज पिळवटून टाकणारं चित्र या कथेतून लेखकाने  रेखाटले आहे.

'उजेडातून अंधारात’ या कथेत मंगल बाईचा नवरा दुष्काळामुळे आलेल्या नैराश्येतून गळफास लावून घेतो. नवऱ्याच्या मुत्यृनंतर मंगलाबाई हताश होते, यातच दोन्हीं मुलींचं जीवन उध्वस्थ होतं. भाऊ बदंकी ही परक्यासारखं वागवते व याच दुःखाच्या काळोखीत ती नाहीशी होते.

'धिंड' या कथेत धना हा मोठा भाऊ आपल्या वडिलांच्या पाठी लहान भावाचा संभाळ करतो. त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवतो. प्रसंगी कर्ज उचलतो, शेतीभाती विकतो. यात त्याची बायको जयाही त्याला साथ देते. नंतर गणा प्राध्यपक होतो मात्र गावी फिरकतही नाही याच काळात धना गळफास लावून घेतो. मात्र चंदा आणि जया पोरक्या होतात. गणा तेव्हा येतो मात्र आहे ते शेती व घरदार यात हिस्सा मागून ते विकायची भाषा करतो तेव्हा संपूर्ण गाव जयाच्या पाठिशी उभा राहतो अन् गणाचे केस भादरून तोंडाला गुलाल माखून धिंड काढणार तोच जना आडवते व त्याला माफ करा म्हणते. गाववाले त्याला गावातून हाकलून देतात. अशीही कथा अतीशय भावूक व रंजक तरीही डोळ्यात अंजन घालणारी आहे.

'चौघीतली चौथी' या कथेत नियतीचा फास कोंडिबा पाटलाचा बळी घेतो आणि चार लेकीच्या लग्नाचा बोजा सावरता खंगून गेलेला कोंडिबा चौथ्या पोरीचं कृष्णाचं लग्न अंबादास बरोबर लावून त्यांना एक मुलगी होते. तिचं नाव ते रमा ठेवतात. पण काळ एक दिवस अंबादासचा बळी घेतो, कृष्णामायची मायबाप बी राहत नाही. कृष्णामाय आपल्या लेकिला दिराच्या पदरात टाकून निघून जाते. रमा पुढे शिकून डाॅक्टर होते. कृष्णामाय व तिची भेट पुढे होते अतिशय नाटयमय रित्या चित्रीत केलेली ही कथा आयुष्यातील प्रश्नांना, प्रसंगाना ही पात्रं कशी सामोरी जातात. एकाकी आभाळ कोसळल्यावर जग कसं बदलतं हे दर्शवतात हे प्रत्येकाने वाचून शहाणं होण्यासारखं आहे.

'सवत' या कथेत सवतीच्या पायात नवरा गमावलेल्या कल्पीची ही कथा तिची असहाय्यता शेवटी तिचा व तिच्या बाळाचाही घोट घेते.  'शेषप्रश्न' ही कथा शेषराव काकांची, ते जीवनाची वाट अर्ध्यावर सोडून गेले तेव्हा त्यांच्या मुलाचा वर्गमित्र या कथेतील कथन मांडतो, शेषकाका, 'आयुष्याची दोरी तुटेपर्यंत जगायचं. आपणहून दोरखंडानं ती दोरी तोडायची नसते, हा आयुष्याचा धर्म आहे. तो तुम्ही पाळला नाही." याच काळात त्यांची बायको मूक बनते. चंदर, त्यांचा मुलगा, त्याच्या मागे गाव राहतं व त्याचं लग्न लावून संसार थाटून देतं. अशीही सकारात्मक-तेकडे झुकणारी कथा अतीशय उत्कृष्टपणे विषय लेखकाने हाताळला आहे.

'सावतर माय' या कथेत कधी कधी निसर्गाचा कोप हा सावतर आई सारखा वागतो. हे अतीशय मार्मिकपणे लेखकाने दासा व त्याच्या परिवारावर बेतलेल्या कठिण प्रसंगातून रेखाटले आहे. लेखक या कथेत लिहितो,
'चार वर्सं सलग सुख हा खरं म्हंजे शेतकऱ्यावर अन्याय न्हवं काय ? निसर्ग ही शेतकऱ्याची सावतर माय. या चार वर्सात सावतरपणाचं नातं नीट निभावलंसं दिसत न्हाई. इतकं लांबलचक सुख पाहण्याची शेतकऱ्यांच्या डोळ्यांना सवय न्हाई. या सावतर मायनं इतका काळ कसा काय कानाडोळा केला ? काय मंता काई कळत न्हाई. खरंतर या गुन्ह्याबद्दल तिच्यावर एफआयआर दाखल करायला हवा.... पदरात सुखाचं दोन तुकडं टाकून आजचं मरण उद्यावर ढकलणारी ही दुष्ट माय अशी कशी वागू शकते ?'

'निरोप', 'अधुरी एक कहाणी', 'मला ढकलून द्या', 'दिवा', 'दुसऱ्या घरी', या कथातून घरातला कर्ता माणूस जेव्हा विवश असहाय्यतेच्या कचाट्यात सापडून गळफास घेतो तेव्हा घरातल्या बाईमाणसांवर, लेकरांवर, लेकी-सुनांवर कसं आभाळ कोसळतं, त्या कशा उदारनिर्वाह करतात, मार्ग काढतात, कधी कधी नियतीसमोर हतबलही होतात हे वास्तव या कथांतून लेखकांने मांडले आहे.

अशा एकून बारा कथा बारा गावच्या दुःख म्हणजे काय, दैव म्हणजे काय नशिबाचे फासे उलटे पडले की तेढ कसा पडतो व गळ्याभोवतीचा पिळ जीतेपणीच माणसाला तीळ तीळ मारतो. मेलेला मरतो पण जीवंतपणी मरणयातना भोगणं हे वाईटच तरीही हताश न होता लढणारा शेतकरी प्रसंगी पाठिशी उभा राहणारी गावातली माणसं ही या कथासंग्रहाची दुसरी बाजू अतीशय आशादायी व सुखदायक आहे. शेतकऱ्यांचे, जीवन काय असते हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळतं. प्रत्येकाने वाचावा असा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण साहित्यात या संग्रहाची दखलही घेतलीच जाईल. ग्रामीण जीवनाचं हुबेहुब चित्रण लेखकाने या कथासंग्रहातून केले आहे.


'दोरखंड' हा कथासंग्रह ‘गणगोत’ प्रकाशनाचं पहिलंच अपत्य, अतीशय देखणं आणि तितकंच गुणवान. प्रकाशक- संपादक-पांडुरंग पुठ्ठेवाड याचं व लेखक ग.पि. मनूरकर यांचे व याचबरोबर या पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखेचे लोभस रुप

हृदयस्थ भावनांचा सहज सुंदर व संयत शब्दाविष्कार म्हणजे अतीशय आशयगर्भ रेखाटल्याबद्दल कवी व चित्रकार. विष्णू थोरे सरांचेही खूप खूप अभिनंदन.



दोरखंड - लेखक- ग.पि.मनूरकर - नांदेड (९४२३४३८४४४)

गणगोत प्रकाशन- पांडुरंग पुठ्ठेवाड ( राजुरा- नांदेड)

संपर्क- (९६६५६८२५२८)

मुखपृष्ठ- विष्णू थोरे

पुस्तक परिचय- तनुजा ढेरे 



Add caption

No comments: